
दिल्लीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उधळलेल्या स्तुती सुमनांनी राजकारणातील अनेकांची झोप उडवली आहे. त्यात सर्वाधिक गारद झाली ती अर्थातच महाविकास आघाडीतील शरद पवारांची सोबती शिवसेना. शिंदेंवरील स्तुती शिवसेनेला मानवली नाही. त्यांनी पवारांवर टीका डागली. ज्यांची पत नाही, तेही बोलले आणि ज्यांची आहे त्यांनीही मागचा पुढचा विचार न करता टीकेची झोड उठवली. ज्यांना पवारांच्या अशा भूमिकेची जाणीव आहे, ज्यांना पवारांच्या स्तुतीमागची गणितं ठावूक आहेत, तेच पवारांना ओळखू शकतात. गेल्या चार वर्षांची सोबत असलेल्या उध्दव ठाकरेंना आणि त्यांच्या सेनेच्या नेत्यांनाही ते जमलेलं नाही, हे मान्य करावं लागेल.
एकनाथ शिंदे यांना वीरपुरुष महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने पवारांच्या ह्ते गौरवण्यात आलं. एकनाथ शिंदे यांचा सत्कार म्हणजे अमित शहा यांचा सत्कार असल्याचं सांगत सेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह अनेकांनी पवारांवर टीका केली. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गेल्या पाच वर्षातील नात्यांची गणितं पाहिली की शिंदे यांच्याविषयी सेना पदाधिकारी आणि तळागळातील कार्यकर्त्यांच्या मनात असलेली चीड समजण्यासारखी आहे. एक पक्ष फोडून त्या पक्षावर दावा करताना सारी नैतिकता दावणीला लावण्याचं पातक शिंदेंच्या मागे आहेच. सत्तेसाठी त्यांनी केलेल्या कृत्याला क्षमा नाही, ही शिवसेनेची भूमिका अगदीच अयोग्य आहे, असं मुळीच नाही. मात्र तरीही शिंदेंचा सत्कार केला वा त्यांच्याविषयी स्तुतीसुमने उधळली म्हणून पवारांना दोष देण्याचा शिवसेना आणि त्यांच्या पदाधिकार्यांना अधिकार नाही, असं अनेकांना वाटतं. पवारांचं आजवरचं राजकारण पाहिलं तर त्यात असलेल्या असंख्य कलांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. अगदी वसंतदादा पाटील यांचं सरकार पायउतार करताना पवारांनी सारासार विचार केला नाही, असं सांगणारे कमी नाहीत.
इथे एकट्या शिवसेनेच्या फुटीचा प्रश्न नव्हता. तो पवारांच्या राष्ट्रवादीच्या फुटीचाही विषय होताच. तेव्हा शिवसेना फुटीचं पातक उध्दव आणि त्यांचे सैनिक एकट्या एकनाथ शिंदेवर टाकत असतील तर ती सेनेची मोठी घोडचुक आहे. शिवसेनेला धक्क्याला लावताना पवारांनी २०१४ च्या सत्तेवेळी जी खेळी खेळली ती शिवसेना इतक्या लवकर विसरेल, असं वाटत नव्हतं. तेव्हा नाराज असलेल्या शिवसेनेचं महत्व कमी करण्यासाठी पवारांनी राज्यात सत्तेसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. पवारांच्या या गेममुळे शिवसेनेचं कधी नव्हे इतकं नुकसान झालं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या या देकाराचा पध्दतशीर फायदा घेतला आणि युतीच्या सत्तेत शिवसेनेला दुय्यम खाती देऊन त्यांची जागा दाखवून दिली. बिन महत्वाची खाती सेनेच्या वाट्यात टाकून पाहिजे तर बोला, अशी थेट भूमिका घेतली.
फडणवीसांचा हा धडा, त्यानंतर २०१९ च्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपने घेतलेली भूमिका आणि त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले उध्दव ठाकरे हाही पवारांच्या गेम चेंजचा चमत्कार होता, हे लक्षात घ्यायला आज शिवसेना तयार नाही. पवारांच्या आजवरच्या वाटचालीत ते कोणाला वाटलं म्हणून कधी कोणाचा तिरस्कार करत नाहीत आणि कोणाला उगाच महत्वही देत नाहीत. पवार जेव्हा असं करतात तेव्हा त्यांच्या डोक्यात दुसरंच काही सुरू असतं. एखाद्याचं महत्व वाढवायचं म्हणजे त्याच्यावर विसंबून असलेल्याचं स्थान डगमळीत करायची खासी पध्दत पवारांच्या राजकारणाची राहिली आहे. हे शिवसेनेच्या नेत्यांना ठावूक नाही असं नाही.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला ते एकटे कारण आहेत, असं मानण्याचं मुळीच कारण नाही. अख्खा भाजप त्यांच्या मागे होता.
देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना एकनाथ शिंदे यांच्या आणि त्यांच्या समर्थकांमागे लावून त्यांना शिवसेनेपासून दूर करण्याचं कारस्थान रचलं. रातोरात हे ४० जण गोहाटीला पोहोचले आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या निचत्तम पातळीने शिवसेनेची केलेली हानी सगळेच जाणतात. यामागे ज्या व्यक्तीचा हात होता त्या फडणवीस यांच्याबाबत शिवसेनेची आजची भूमिका काय आहे? आज तो पक्ष फडणवीसांविषयी आश्चर्यकारकरित्या मवाळ झालेला दिसतो आहे. एकनाथ शिंदे तर सेनेच्याच कुटुंबातील होते. गोंजारलं तर ते किंवा त्यांचे शिलेदार आज-उद्या पुन्हा सेनेकडे वळतीलही. पण फडणवीस यांचं तसं नाही. सत्ता या एकमेव ध्येयासाठी ते कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतात, हे सार्या देशाने पाहिलंय. सेनेत उभी फूट पाडताना याच सेनेच्या मदतीने २०१४ साली आपण राज्याचे मुख्यमंत्री झालो होतो, याची जाणीवही त्यांनी ठेवली नाही, ते फडणवीस सेनेसाठी प्यारे ठरत असतील, तर याच न्यायाने फडणवीसांच्या पायावर पाय ठेवणारे एकनाथ शिंदे पवारांना जवळचे वाटत असतील तर त्यांना गैर कसं समजायचं?
महाराष्ट्राच्या राजकारणाचं सर्वाधिक नुकसान कोणी केलंय, हे राज्यातल्या जनतेला सांगण्याची काही आवश्यकता नाही. अशांच्या मांडीवर बसून शिवसेना आपलं राजकारण करणार असेल तर शिंदेंच्या राजकारणाला गैर समजण्याची चूक पवार करतील, असं माननंच भाबडेपणाचं होय. राजकारण आणि नैतिकता हा विषय महाराष्ट्रात आजतरी शिल्लक राहिलेला नाही. याआधी त्याला जरूर महत्व होतं. मात्र सत्तेसाठी काहीही करण्याची आसक्ती निर्माण झाल्यापासून नैतिकतेला तिलांजली दिली गेली आहे. पवारांनी ती जोपासली पाहिजे, असं सहकार्यांना वाटत असेलही. मात्र पवारांचंही स्वतंत्र राजकारण आहे.
त्यांनाही आपला पक्ष चालवायचा आहे. त्यात अजित पवारांनी फडणवीसांच्याच मदतीने पवारांपुढे आव्हान उभं केलं आहे. असं असताना सेनेला वाटतं म्हणून शिंदेंना दुखवण्याची गल्लत त्यांनी का करावी? राजकारणात एखाद्याची खोड मोडायची असेल तर त्याच्या नवजात शत्रूला शक्ती देणं हा अनैतिक शास्त्राचा नवा गूण आहे. त्या गुणाचा अवलंब करून फडणवीसांना चकवण्याचा हेतू पवारांच्या डोक्यात घोळत असेल तर तो त्यांच्या राजकारणाचा भाग म्हणता येईल. महाराष्ट्रात युतीची सत्ता येण्यासाठी सर्वाधिक कारण ठरलं ते एकनाथ शिंदे यांचं धोरण. पण याच एकनाथ शिंदेंचं महत्व कमी करण्यामागे फडणवीस यांनी आपली शक्ती खर्ची घातलेली दिसते आहे. पवारांची साथ सोडून युतीत दाखल झालेल्या अजित पवारांचं महत्व वाढवत फडणवीसांनी शिंदेंच्या अस्तित्वाला धोका निर्माण केला आहे. अजित पवारांचं महत्व वाढणं म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाला आव्हान देण्यासारखं होय. हे सारं कारस्थान केलं जात असताना एकनाथ शिंदे यांना बळ देण्याचे फायदे पवारांना ठावूक नाहीत, असं वाटणंच गैर आहे.
पवारांचं राजकारण नैतिकतेला धरून असतं, असा दावा कोणीही ठामपणे करू शकत नाही. त्यात सेनेसाठी आपण नैतिकतेने वागलंच पाहिजे, असं काही पवारांवर बंधन नाही. ते फडणवीसांना बळ देत असताना हे शिंदेंची ताकद वाढवून आपल्या पक्षाच्या फुटीचं उट्टं काढणं कर्तव्य मानत असतील तर तो पवारांचा प्रश्न होय. सामान्यांना जे गैर वाटतं ते पवारांना गैर वाटेलच असं नाही. तेही कसलेले राजकारणी आहेत. आपल्या पुतण्याला ताकद देऊन पवारांचं महत्व ज्यांनी कमी केलं त्यांचेच गोडवे गायले जात असतील, तर अनैतिक असूनही शिंदेना ताकद दिली तर ते गैर कसं?
पवारांचे मानसपुत्र समजले जात असलेले माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सेनेच्या टीकेला उत्तर देताना एका ओळीत सेनेने केलेल्या चुका दाखवून दिल्या आहेत. ज्यांनी तुमचा पक्ष फोडण्यासाठी सारी ताकद पणाला लावली त्या फडणवीस यांची भेट घेताना तुम्हाला जर गैर वाटत नसेल, ज्यांनी आमचा पक्ष फोडला त्या अजित पवारांची भेट तुम्हाला वर्ज्य नसेल तर तशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी शिंदेंची स्तुती केली तर त्यांना दोष देण्याचा अधिकार सेनेला राहत नाही.
(लेखकाशी संपर्क – ८१६९१३५२५३)

