संगमनेर, दि. १९ फेब्रुवारी –
छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांनी सांगितलेला मानवता धर्म पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे जगाचे प्रेरणास्थान असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात आदींनी अभिवादन केले.

शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, माजी शहराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगरसेवक गणेश मादास, रामहरी कातोरे, जीवन पंचारिया, धीरज टाक, डॉ. सुचित गांधी, आलोक बर्डे, खंडू सातपुते, अंबादास आडेप, सुमित पवार, अण्णा शेलकर, धीरज देशमुख, व्यंकटेश देशमुख, ऋतिक राऊत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व घटकांना बरोबर घेत सर्वांच्या प्रगतीसाठी तसेच लोकशाहीचा पाया घालून जगाला सर्वधर्मसमभावाचे शिकवण दिली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जगाचे प्रेरणास्थान बनले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव, लोकशाही, गरिबांच्या कल्याणाची शिकवण दिली. समाजातील अठरापगड जाती-जमातींना बरोबर घेऊन स्वराज्य उभारले. स्वाभिमानाची शिकवण दिली. बलाढ्य शक्ती विरुद्ध लढताना स्वराज्यातील गोरगरिबांच्या हिताचे रक्षण केले. त्यांचा वारसा घेऊन प्रत्येकाने काम केले पाहिजे.
जयश्री थोरात म्हणाल्या, महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे. लोककल्याणकारी शासन व्यवस्था त्यांनी निर्माण केली. स्वराज्यातील आणि परराज्यातील सर्वसामान्यांचा त्यांनी आदर सन्मान केला. धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया, लहान मुलं यांचा सर्वांनी सन्मान करावा असा नियम केला. शिवाजी महाराजांचे चरित्र प्रत्येकाला जीवन जगताना मोठी स्फूर्ती देत असून मार्ग दाखवत आहे.
विविध ठिकाणी जयंती साजरी… लोकनेते बाळासाहेब थोरात व डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, राजहंस दूध संघ व यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


