नीरज बाबासाहेब गाढे –
साडेतीन शक्तिपीठं एकाच ठिकाणी असल्याची मान्यता अहिल्यानगरमध्ये आहे. कोल्हारचे भगवती माता मंदिर हे साडेतीन पीठांचं शक्तिस्थान म्हणून ओळखलं जातं. तसेच प्रभू श्री राम यांनी वनवासात असताना येथे स्थापित केलेले वाळूचे शिवलिंग पुढे जाऊन कोल्हाळेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. याच सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या कोल्हार भगवतीपूर येथे ७ मे १९५९ रोजी राजेंद्र शिवाजीराव गाढे यांचा गाढे पाटील कुटुंबात जन्म झाला. पुढे “गाढे काका” या नावाने संगमनेर, घुलेवाडी परिसरात ओळखले जाणारे हे सुंदर नेतृत्व २४ फेब्रुवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने काळाआड गेले व सर्वांचे आवडते, सर्वाना प्रेरणा देणारे, सामाजिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून भाग घेणारे, कुठेही भेटल्यावर पोटभरून गप्पा करणारे, खुशाली विचारणारे, हसतमुख, विचारी, कुशल व्यक्तिमत्व घुलेवाडी येथील रहिवाश्यानी गमावले. अश्याच या व्यक्तिमत्वाचा कणखर पण प्रेरणा देणारा प्रवास इथे लिहिला आहे.
लहानपणापासूनच घराण्यातील शिस्त, चालीरीती आणि संस्कार याची योग्य शिकवण त्यांना वडील शिवाजीराव, आई सुशीला यांच्याकडून मिळाली. चिकाटी, अभ्यासू वृत्ती हे सर्व गुण त्यांच्या अंगी होतेच पण त्याचप्रमाणे अतिशय बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता, धाडस आणि नेतृत्व त्यांच्यामध्ये होते . अश्या गुणांचा योग्य प्रभाव त्यांच्या जीवनात असल्यामुळे त्यांनी त्याकाळी कोल्हार भगवतीपुर या गावातून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर महात्मा गांधी विद्यालय (प्रवरानगर) येथून उच्च माध्यमिक शिक्षण प्राप्त केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील शिक्षण संस्था (लोणी) येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेब शिवाजीराव गाढे, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना सेवानिवृत्त (बीएससी अल्कोहोल टेकनॉलॉजी, कानपुर) हे राजेंद्र यांचे मोठे भाऊ . त्यांनी राजेंद्र याना पुढे अभ्यास चालू ठेवण्यास प्रोत्साहन दिले. आपल्या भावाने दिलेल्या या आधारावर राजेंद्र उच्चशिक्षित झाले. परिवाराला बिकट परिस्थितीतून प्रगतीकडे घेऊन जाण्यात या दोन्हीही भावांचा सिहांचा वाटा आहे.

आज छोट्या कुटुंबातही आपण तणाव होताना बघतो, पण या दोघांनीही आपले एकत्र कुटुंब कुशलरित्या सांभाळले. राम-लक्ष्मणाप्रमाणे वावरणारे दोघही भावंडं मित्रमंडळी आणि गावात प्रसिद्ध होते. कोल्हार परिसरातील अनेक नामवंत मंडळी यांच्याशी त्यांची लहापणासूनची घट्ट मैत्री होती जी आजपर्यंत टिकून आहे. मित्र त्यांना प्रेमाने “राजा” असे संबोधत.
पुढे जाऊन उत्तराखंड, सहारानपूरजवळील रुरकी महाविद्यालय सध्याचे आयआयटी येथे पेपर टेकनॉलॉजी या अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली. या अभ्यासक्रमासाठी निवड होणारे ते आपल्या भागातील पहिलेच व्यक्ती. श्रीरामपूरवरून थेट उत्तराखंड येथे रेल्वे प्रवास करत पोहचले व १९८२-८३ असे दोन वर्षात हे शिक्षण पूर्ण केले. पुढे जाऊन त्यांनी या ज्ञानाचा वापर महाराष्ट्रातील बऱ्याच पेपर मिल उभारणीमध्ये केला. आपल्या कामाची आवड आणि कामात कौशल्य असल्यामुळे त्यांना नेहमी यश मिळत गेले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना पेपर मिल, कोपरगाव सहकारी पेपर मिल, टिळकनगर पेपर मिल, औरंगाबाद येथील पेपर मिल्स अश्या बऱ्याच ठिकाणी ह्या उद्योगांचा अगदी या व्यवसायाचा पाया रचण्यापासून ते पूर्णतत्वावर येण्यापर्यंत त्यांनी विशेष योगदान दिले.
त्यांच्या जीवनात त्यांना काही शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागले पण त्यांनी नेहमीच लढते रहो हा नारा चालू ठेवला. यातच त्यांची पत्नी छाया यांनी त्यांची नेहमी सावली बनून प्रत्येक गोष्टीत साथ दिली. व संसार योग्य रीतीने जोपासला. सकाळी नित्य व्यायाम, पूजाअर्चाबरोबर साधे सोपे जीवन व सर्वांची मदत करण्याचा या कुटुंबाचा नेहमी ध्यास होता. कुणाचीही मदत करत असताना त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असायचा. आजकालची पिढी जी छोट्या मोट्या आव्हानांना घाबरून युद्ध सोडून देते त्यांना या संघर्ष योध्यांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

जीवनात चिकाटी, अभ्यासू वृत्ती आणि शिक्षणाला भरपूर महत्व त्यांनी दिले. त्या काळातील पुरोगामी विचाराना दुजोरा देत मुलगा-मुलगी असा कधीही भेदभाव न करता त्यांनी आपल्या मुलाचे आणि मुलीचे इंग्रजी शिक्षण यास नेहमी प्राधान्य दिले व आपल्या परिवारात आणि सभोवताली ह्याच तत्वांचा प्रचार केला. त्यांच्या याच तपश्चर्येमुळे दोन्ही मुले आज उच्चशिक्षित झाली. मुलगा शंतनू राजेंद्र गाढे (रा. कांचन कम्फर्ट सोसायटी, संगमनेर) संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन आज तो अमेरिकेतील सक्रिमेंटो शहरात स्टेकनेक्सस या कंपनीमध्ये संगणक अभियंता सिनिअर टेकनिकल लीड म्हणून कार्यरत आहे . मुलगी मयुरी परमानंद शिंदे हि ME सिविल इंजिनिर असून अमृतवाहिनी अभियांत्रिकी विद्यालयात प्राध्यापक व उत्कृष्ट वक्ता आहे. सून राजेश्वरी संगणक अभियंता असून पुणे येथे कार्यरत आहे.
एकत्र कुटुंब पद्धती दूर राहून देखील टिकवता येते याचा आदर्श म्हणजे गाढे कुटुंब. काका राजेंद्र यांनी नेहमी आपला भाऊ बाबासाहेब गाढे व वाहिनी साधना गाढे यांचा आदर आणि परिवाराची साथ कधीच सोडली नाही. आज त्यांचे पुतणे निरज बाबासाहेब गाढे (रा. वाकड, पुणे) हे पी जी – इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, एम टेक वि जे टि आय – मुंबई या कंपनीत पुणे येथे सॉफ्टवेअर आर्किटेक्ट आहेत . निरज यांच्या पत्नी सायली ( एम टेक वि जे टि आय – मुंबई) या देखील पुणे येथे कार्यरत आहे. पुतणी प्राजक्ता रोशन नवले ही संगणक अभियंता असून पुणे येथे कार्यरत आहे. गाढे कुटुंबातील दोन्ही जावई उच्च शिक्षित असून आपआपल्या क्षेत्रात यशस्वी आहेत.
आपल्या लग्नानंतर त्यांचा संबंध भाकरे कुटुंबाशी जावई म्हणून आला. यातही त्यांना खूप छान नाती मिळाली. जी दोन्हीही कुटुंबांनी खूप छान जोपासली. शिक्षण आणि संस्कार याचा पाठपुरावा करत राजेंद्र गाढे यांनी हा यशस्वी परिवार आज तयार केला आहे. त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या कालखंडात ते कांचन कम्फर्ट गृहनिर्माण संस्था घुलेवाडी, संगमनेर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे त्यांनी अनेक मित्र, सहकारी मिळवले. विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमातून त्यांनी नेहमीच आपले योगदान दिले. कांचन कम्फर्ट गृहनिर्माण संस्थेचा कार्यभार सांभाळण्याचे कार्यही त्यांनी काही वर्ष केले. कांचन कंफर्ट गृहनिर्माण संस्थेतील सर्वच रहिवाशांनी त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली. त्यांचे हक्काचे गाढे काका हिरावल्यामुळे दुःख व्यक्त केले.
मनुष्य जन्माला येतो त्याचवेळी तो कधीतरी या पृथ्वीतलावरून जाणार हेही तितकेच सत्य असते. पण जीवन जगात असताना जीवनाचा सर्वतोपरी आनंद घेत, कष्ट करणारे, राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात योगदान देणारे आणि एक कर्तबगार सुसंस्कृत पिढी घडवणारे कै. राजेंद्र गाढे पाटील सारखे लोक कमीच असतात. या संघर्ष योध्याला अखेरचा प्रणाम!


