
राहुल जाधव पाटील
रमजान हा केवळ उपवास करण्याचा महिना नाही तर तो आत्मशुद्धी संयम आणि परोपकाराचा महिना आहे. या महिन्यात उपवास म्हणजे फक्त अन्न आणि पाणी टाळणे नसून आपल्या मनातील वाईट विचार ईर्ष्या लोभ आणि अहंकार यांना दूर करण्याचा सोहळा असतो.
सकाळी लवकर जेव्हा संपूर्ण जग शांत असते तेव्हा रमजानचे पहिले किरण मनावर उमटतात. कुटुंब एकत्र येऊन सेहरी घेतात. त्या क्षणी एकत्र असण्याचा आनंद डोळ्यांच्या कडा ओलावणारा असतो. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना एकवेळचे अन्न मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. उपवासात केवळ भुकेची जाणीव होत नाही तर भुकेच्या वेदना सहन करणाऱ्या गरिबांचे दुःखही मनाला जाणवते.
दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी जेव्हा अजानचा आवाज कानावर पडतो तेव्हा मुस्लिम बांधवांना मनाला एक वेगळेच समाधान मिळते. पहिला घास तोंडात टाकताना वाटते अल्लाहने दिलेल्या या कृपेचे आपण कितीही आभार मानले तरी ते कमीच. रमजानमध्ये माणसाला आपल्या आयुष्यातील सगळ्या सुखसुविधांची किंमत कळते.

रमजान फक्त उपवासाचाच नाही तर या महिन्यात दानधर्म, गरीबांना मदत आणि दुसऱ्यांची दुःखं समजून घेणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. आपल्या समोरच्या ताटात भरपूर अन्न असताना रस्त्याच्या कडेला उपाशी झोपणाऱ्याचा विचार मनाला हेलावून जातो, म्हणूनच या महिन्यात फितरा आणि जकात देण्याची परंपरा आहे.
रात्रीच्या प्रार्थनेसाठी जेव्हा मुस्लिम डोळे मिटून हात वर उचलतात तेव्हा केवळ स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण मानवजातीसाठीही दुआ मागितली जाते. हे अल्लाह प्रत्येक भुकेल्या पोटी अन्न मिळू दे, प्रत्येक पाण्यासाठी तहानलेल्या ओठांना पाणी मिळू दे, प्रत्येक दुःखी हृदयात आनंद भरू दे आणि शेवटी येतो तो ईदचा आनंद सोहळा.
पण हा सोहळा केवळ नवीन कपडे घालण्याचा किंवा स्वादिष्ट शिरखुर्म्याचा नसतो तर तो आत्मशुद्धीचा आपल्यातील बदलाचा आणि जगाकडे नव्या नजरेने पाहण्याचा असतो. रमजान आपल्याला शिकवून जातो की या जगात सगळ्यात मोठा खजिना हा पैसाच नाही तर माणुसकी सहानुभूती आणि प्रेम आहे.
या महिन्याचा खरा अर्थ समजला तर जीवनाचा मार्गच बदलतो आपण केवळ स्वतःच्या पोटाची भूक भागवणारे नसतो तर इतरांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरवणारे होतो आणि हेच रमजानचे खरे सौंदर्य आहे. आत्मशुद्धी परोपकार आणि प्रेमाचा उत्सव.



