
संगमनेर, दि. ३ मार्च – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्याची तोडफोड करण्याच्या उद्देशाने आश्वी बुद्रुक येथे प्रस्तावित केलेल्या अप्पर तहसील कार्यालयाला संपूर्ण संगमनेर तालुक्यातून मोठा विरोध होत आहे. जोर्वे येथील ग्रामसभेत या तहसील कार्यालयातला कडकडून विरोध करण्याचा ठराव एकमताने संबंध झाला. यावेळी विखे समर्थकांनी आश्वी येथेच कार्यालय करण्याची मागणी केली. यावर संपूर्ण गावातील नागरिक महिला व युवक आक्रमक झाल्याने विखे समर्थकांनी पळ काढला.
जोर्वे येथील ग्रामपंचायतच्यावतीने जुने गावातील पारावर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या ग्रामसभेत एकमताने आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अपर तहसील कार्यालयाला विरोधाचा ठराव मांडण्यात आला. याला सर्व गावाने झालेल्या मतदानातून संमती दर्शवली. मात्र तालुक्याच्या आणि जोर्वे गावच्या कायम हिताच्या विरोधी असणाऱ्या काही निवडक मंडळींनी आश्वी बुद्रुक येथे अपर तहसील कार्यालय करावे, अशी मागणी केली यावर संपूर्ण गाव संतप्त झाले.
संगमनेर शहर हे जोर्वे गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे. सर्व सुविधा आहेत. दळणवळणाची साधनं आहेत. सर्व कार्यालय एकाच ठिकाणी आहे. शाळा व महाविद्यालय आणि दैनंदिन संबंध हा संगमनेरशी आहे. असे सर्व असताना फक्त राजकारणासाठी काही मंडळी आश्वीचे समर्थन करत आहे. हे कितपत योग्य आहे असे उपसरपंच बादशहा बोरकर यांनी विचारले.
यावर सर्व गावाने एकमताने ठराव करून आश्वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालयाला कडाडून विरोध केला. यावेळी ग्रामसेवक बाजीराव पवार यांनी हात वर करून मतदान घेण्याचे ठरवले.

संपूर्ण गावाने एकमुखी हात वर करून हा विरोध मोठ्या मताधिक्याने मंजूर करून घेतला. यावेळेस मोजणी सुद्धा झाली. मात्र एकवटलेले गाव पाहून सरपंच व विखे समर्थक यांनी पळ काढला. आणि लांब जाऊन अवघ्या वीस पंचवीस लोकांनी प्रसिद्धीसाठी बातम्या तयार केल्या. गाव एका बाजूला आणि विखे समर्थक पंधरा-वीस लोक एका बाजूला अशी अवस्था संपूर्ण जोर्वे गावामध्ये दिवसभर होती.
जोर्वेसह संगमनेर तालुक्यातील सर्व गावांनी आश्वी बुद्रुक अप्पर तहसील कार्यालयाला कडाडून विरोध केला आहे. संगमनेर तालुक्याच्या मोडतोडीचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे तालुक्यातील नागरिकांनी ठणकावून प्रशासनाला सांगितले आहे. जोर्वे गावाच्या आणि तालुक्याच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या निवडक मंडळीचा संगमनेर तालुक्यातून तीव्र निषेध केला जात आहे.
गावापुढे विखेसमर्थक नरमले… जोर्वे हे गाव अप्पर तहसील कार्यालय आश्वीला जोडणे अत्यंत चुकीचे आहे. या विरोधात संपूर्ण गावाने एकत्र येऊन ग्रामसभा घेतली व ठराव मांडला. या ठरावाला मोठा प्रतिसाद मिळाला. शासकीय नियमानुसार मतमोजणी ही झाली. आश्वी अपर कार्यालयाच्या विरोधात मोठे मताधिक्य असल्याने विखे समर्थकांनी बाजूला पळ काढला. तालुक्याच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या या लोकांच्या विरोधात संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधून निषेध होत आहे.


