
विशेष प्रतिनिधी / मुंबई
समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाची भलामण केलेल्या वक्तव्यापासून माघार घेत आपलं वक्तव्य मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. आज त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या विधानावरून सभागृहात गोंधळ घातला. परिणामी, विधीमंडळाचं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं.
अबू आझमी यांनी आज विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रिया पाहून मवाळ भूमिका घेत आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. ते म्हणाले, मी कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं नाही, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझ्या वक्तव्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद पाडल्याने जनतेचं नुकसान होत आहे. इतिहासकार आणि लेखकांनी औरंगजेबाबद्दल जे सांगितलं आहे, तेच मी बोललो आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कोणत्याही महापुरुषांबद्दल मी अवमानकारक बोललेलो नाही. मात्र, तरीही माझ्या वक्तव्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द, वक्तव्य मागे घेतो, असं आमदार आझमी यांनी स्पष्ट केलं आहे.
माझ्या वक्तव्याला विनाकारण राजकीय मुद्दा बनवला जात असून त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला बंद करणं, हे महाराष्ट्रातील जनतेचं नुकसान करण्यासारखं असल्याचं मला वाटतंय, असंही अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

आझमी विरोधात गुन्हा… समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांना औरंगजेबाचं समर्थन करणं भोवलं आहे. त्यांच्याविरोधात वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. वादग्रस्त वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करणं, हिंदूंच्या भावना दुखावणं, सरकार विरोधात अपप्रचार करणं या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आझमी यांच्या विरोधात ठाण्यात शिवसेना आक्रमक झाली. शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे पोलीस ठाण्यात आझमी यांच्या विरोधात सोमवारी घोषणाबाजी करण्यात आली. अबू आझमींनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली.


