
विशेष प्रतिनिधी / मुंबई
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अखेर ज्यांच्यावर सूत्रधार वाल्मिक कराडचा समर्थक समजल्या जाणाऱ्या धनंजय मुंडे यांना अखेर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विधिमंडळाच्या अर्थसकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन केला. मुख्यमंत्र्यांमार्फत पाठविण्यात आलेला राजीनामा राज्यपालांनी देखील स्वीकारल्याने मुंडे आता मंत्री नसतील.
संतोष देशमुख यांच्या मृतदेहाची क्रूर विटंबना करणारी छायाचित्रे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी समाज माध्यमातून बाहेर आली. याची राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि अखेर मुंडे पायउतार झाले. प्रसिद्ध झालेली छायाचित्रं समोर आली, त्यात क्रूरतेचा कळस गाठला गेला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारीच असल्याने राज्यभरात या छायाचित्रांमुळे आक्रोश व्यक्त होत आहे.
ही छायाचित्रं आणि व्हिडिओ सरकार बरोबरच पोलिसांकडेही असताना सरकारने धनंजय मुंडे यांना सातत्याने वाचवण्याचा प्रयत्न केला. यामुळे राज्याची मान शरमेनं खाली गेली. याप्रकरणी आज दुसऱ्याच दिवशी मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी आमदारांनी विधानभावनाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची घोषणा विधानसभेत केली. विरोधकांच्या प्रचंड रेट्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
विरोधकांचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. तर माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारवर तोफ डागली.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, इतक्या उशिरानं केवळ धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, म्हणून सरकार आपलं कौतुक करुन घेऊ शकत नाही. इतकी भयानक घटना घडली असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना वेळीच बडतर्फ करायला हवं होतं, असं सपकाळ म्हणाले.
या अमानुष प्रकरणातील सर्व फोटो, व्हिडिओ, पुरावे पोलिसांकडं आणि पर्यायानं गृहमंत्री, सरकारकडं सुरुवातीपासून होते. या प्रकरणाची पूर्ण माहिती असतानाही राज्य सरकारने धनजंय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न केला. याचाच अर्थ सरकारचा याला पाठिंबा होता. त्यांना हे हत्या प्रकरण दाबायचं होतं, असा आरोप सपकाळ यांनी केला.

आमदार रोहित पवार म्हणाले, देशमुख यांच्या हत्येची स्थिती लक्षात घेता या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करायला हवं, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. हा प्रकार ज्या खंडणीवरून सुरू झाला, त्याची मूळ बैठक धनंजय मुंडे यांच्याच निवासस्थानी झाली होती. राजीनामा घ्यायला ८५ दिवस लागले. हा अहंकार होता, इतके जास्त आमदार निवडून आले, त्यामुळे लोकांचं आंदोलन आणि विरोधाचा सरकारवर दबाव याचा काहीही परिणाम होत नव्हता. मात्र लोकांचं आंदोलन आणि देशमुख परिवारानं जो लढा लढला, यापुढे सरकारला झुकावं लागलं.
राज्याला कितीकाळ फसविणार – सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात पकडलं. त्या म्हणाल्या, हे खूप भयानक आहे. जी चार्जशीट बाहेर आली आहे त्यातील फोटो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाहिले असतील ना? मग राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला? सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी सीडीआर समोर आणलेले आहेत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संवाद हत्येच्या अर्धा तासांमध्ये झाला आहे. याचा अर्थ काय काढायचा आम्ही? ८४ दिवस याकडे कानाडोळा केला गेला आणि आता काय म्हणतात नैतिकतेवर राजीनामा दिला. पण ज्यांनी राजीनामा दिला ते वैद्यकीय कारणाने निर्णय घेतल्याचं म्हणायत. अहो राज्याला किती फसवणार? सगळं राज्य हताश झालं आहे. अशी जोरदार टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्घृण हत्या करण्यात आली त्या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे. गृहमंत्री निष्क्रिय पद्धतीने हे प्रकरण हाताळत होते ते पाहता सरकार मुंडेना वाचवत होते. अत्यंत विकृत पद्धतीनं आरोपीनं सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करूनही सरकार काहीच करत नव्हते, राज्याच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा नैतिकतेनुसार राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिली.


