
संगमनेर, दि. ६ मार्च – प्रतिनिधी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सन २०१३ मध्येच संपूर्ण पूर्तता केली होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कोणतेही अडचण राहिली नव्हती. प्रत्येक वेळी यात काही ना काही निमित्त आडवे आले, राजकारण सुद्धा झाले. मात्र, हा दर्जा मिळण्यासाठी तब्बल अकरा वर्षे का लागली हे मात्र न समजण्यासारखे असल्याची खंत मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली.
बुधवारी (५ मार्च) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के.बी. दादा सभागृह येथे जयहिंद लोकचळवळ व सह्याद्री परिवार यांच्यावतीने प्राध्यापक पठारे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देत त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, संतोष खेडलेकर, प्रा. चं. का. देशमुख, हिरालाल पगडाल, कवी संतोष पवार, कवी पोपटराव सातपुते, अरविंद गाडेकर, अनिल देशपांडे, आचार्य बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, सिताराम राऊत, सुरेश परदेशी, उल्हास पाटील आदी उपस्थित होते.
पठारे म्हणाले, अभिजात भाषेला दर्जा मिळवण्यासाठी हरी नरके यांच्यासह विविध लेखकांनी मोठी मदत केली. मराठी भाषेला समृद्ध परंपरा असून प्रत्येकाने मराठीचा आदर केला पाहिजे. आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवले पाहिजे. त्यांनी इंग्रजीत जरूर शिकावे मात्र प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे. यातून मुलांचा विकास होईल.
मराठीतील सर्व विद्यापीठांमधील इंग्रजीचे प्राध्यापक देखील मराठीतून शिकले आहेत याचीही आठवण करून देत ते म्हणाले, भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून महाराष्ट्राने कमी सैन्यात लढण्याचे गनिमी कावा युद्धतंत्र जगाला दिले आहे. जगातील प्रमुख १० भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे.

माजी आमदार तांबे म्हणाले, भाषा केवळ संवाद नसून संस्कृती आणि भावनेचे प्रतीकदेखील आहे. भाषेची कधीही तुलना करू नका. मराठी भाषेमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह विविध संत, समाज सुधारक, कवी, लेखक आणि साहित्यिकांनी मोठे योगदान दिले आहे. मात्र सध्या मराठी भाषा कमकुवत होत आहे ही चिंचेची बाब आहे.
महापुरुषांचे विचार हे प्रत्येकाच्या मनात आणि कृतीत असायला हवे. आपण ज्या प्रदेशात राहतो ती भाषा आनंदाने स्वीकारली पाहिजे. भाषा एकात्मतेचे प्रतिक असून भाषा धर्म, जात माणसे जोडणारी असावी, तोडणारी नसावी असे देखील ते म्हणाले.
प्रास्ताविक प्रा. लक्ष्मण घायवट यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. गणेश गुंजाळ यांनी केले. प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांनी आभार मानले.

सर्व पूर्तता करूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ११ वर्ष का लागली हे न समजण्यासारखे – प्राध्यापक रंगनाथ पठारे
भाषा केवळ संवाद नसून संस्कृती आणि भावनेचे प्रतीकदेखील आहे. भाषेची कधीही तुलना करू नका. मराठी भाषेमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह विविध संत, समाज सुधारक, कवी, लेखक आणि साहित्यिकांनी मोठे योगदान दिले _ तांबे

