
संगमनेर, दि. ८ मार्च – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील कोंची गावच्या शिवारात असलेल्या वनक्षेत्राच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे मुरूमाची तस्करी होत असल्याचा प्रकार महसूलच्या कारवाईत समोर आला आहे. मुरूम उत्खनन करणारे काही वाहनांसह जण फरार झाले असले तरी एक डंपर आणि पोकलेन ताब्यात घेण्यात अधिकाऱ्यांना यश आले आहे. याप्रकरणी होणाऱ्या कारवाईकडे लक्ष लागले असून या परिसरातून हजारो ब्रास मुरूम चोरी झाल्याचा संशय आहे.
शनिवारी दुपारी कोणत्याही कायद्याला न जुमानता बिनधास्तपणे मुरूम वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. नव्या सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच बीड सारख्या जिल्ह्यात आका संस्कृती उदयास आली असून असे आका आता गावोगावी दिसू लागले आहे. राजकीय पाठबळ मिळत असल्याने या संस्कृतीचा उदय मोठ्या प्रमाणात होत आहे.
अनेक दिवसांपासून राजकीय वरदहस्तातून महसूल प्रशासनावर दादागिरी करत असलेल्या रहिमपूरच्या आकाचा(?) हा उद्योग जाहीर झाल्यानंतर याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाला पुराव्यांसह माहिती देत कारवाईची मागणी केली. त्यानंतर संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे यांनी मंडळाधिकारी जेडगुले आणि संबंधित तलाठ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले होते.

दरम्यान कारवाईसाठी येत असलेल्या महसूल प्रशासनाची चाहूल लागताच काहीजण तेथून वाहनांचा पसार झाले असल्याचे बोलले जाते. मात्र घटनास्थळी कारवाईसाठी गेलेल्या पथकाला बघतात एक पोकलेन चालक आपल्या ताब्यातील पोकलेन सोडून तेथून पसार झाला. पथकाने पोकलेन आणि डंपर ताब्यात घेतला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथकही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. चालक पळून गेल्याने पकडलेली वाहने पोलीस ठाण्यात कशी आणायची असा प्रश्न कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला होता.
दरम्यान कारवाई करणारे अधिकारी कर्मचारी दबावाखाली असतानाही त्यांनी दबाव झुगारून लावत कारवाई केली.
वनक्षेत्राच्या या परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खनन झाल्याचे समोर येत आहे. प्रशासन या उत्खननाचे मोजमाप करणार का, पकडलेल्या पोकलेन आणि डंपर चालक-मालकावर काय कारवाई करणार असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. मुरूम तस्करांवर या आधीही कारवाया झाल्याने व जप्त केलेले वाहने प्रशासनाच्या ताब्यातून पळविण्यात आल्याने आता अशा तस्करांवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. आजच्या कारवाईत थेट पुरावेच हाती आल्याने मोठ्या कारवाईची अपेक्षा या संदर्भात कोणता गुन्हा दाखल होतो याकडे देखील लक्ष लागले आहे.

संगमनेर तालुक्यात वनक्षेत्रातून राजरोस गौण खनिज उत्खनन, कोंची गावात महसूल आणि पोलिसांची कारवाई; काही जण फरार
राजकीय वरदहस्त मिळत असल्याने गौण खनिज तस्करीच्या माध्यमातून आका संस्कृतीचा उदय होतोय का?

