
संगमनेर, दि.११ मार्च – प्रतिनिधी
शिवद्रोही राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, सुधांशु त्रिवेदी, भगतसिंग कोशारी, अबू आझमी, मनोहर भिडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच बीड व परभणी जिल्ह्यातील संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कमी पडलेल्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा मागण्यांचे निवेदन मंगळवारी संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना देण्यात आले आहे.
संभाजी ब्रिगेडच्यावतीने हे निवेदन देण्यात आले आहे. तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिवद्रोही असलेले वरील सर्व गुन्हेगार वारंवार स्वराज्य प्रेरिका जिजाऊ, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभुराजे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महामानव आंबेडकर आशा बहुजनांच्या थोर महापुरुषांबद्दल जाणीवपूर्वक वादग्रस्त विधाने करत आहेत. हे प्रकार थांबावेत यासाठी या नीच विकृत विचारांच्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी.

तसेच परभणी मध्ये संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी या नागरिकाला पोलीस प्रशासनाने कोठडीमध्ये थांबून अन्याय अत्याचार करत त्याचा खून केला. त्या सोमनाथ सूर्यवंशी ला न्याय मिळायला हवा व गुन्हेगाराला कडक शिक्षा व्हावी. याशिवाय बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे निर्घृण हत्या करण्यात आली. यातील आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी.
२०१४ पासून राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कमी पडलेल्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे.
शिवश्री राम अरगडे, अनिकेत घुले, मोहसीन शेख, अमोल शेलकर, रोशन गोफणे, शुभम आव्हाड, आदिल रुपवते, योगेश गायकवाड, प्रथमेश बालोडे, रोहित गुंजाळ आदी उपस्थित होते.



