
विशेष प्रतिनिधी / मुंबई
हिंदूंनी हिंदूसाठी चालवलेले मटणाचे दुकान असे म्हणून मल्हार मटणाचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती, असं विधान नितेश राणेंनी केलं आहे. मंत्री नितेश राणांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फोडले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे यांना इतिहास शिकण्याचा सल्ला दिला आहे. इतिहास वाचला पाहिजे, तेव्हाच खरा इतिहास कळेल, अशा कानपिचक्या अजित पवारांनी नितेश राणेंना दिल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मी अधुन-मधून पुस्तकं वाचतो, पण नितेश राणेंनी वाचलेले पुस्तक कदाचित माझ्याकडून वाचायचे राहून गेलं असावं. कारण मी जे वाचलं त्यात शिवाजी महाराजांबरोबर काही मुस्लिम होते. एकही मुस्लिम नव्हता असं नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढणारे देशभक्त मुस्लिम होते, असंही मुनगंटीवार म्हणाले.
नितेश राणेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना इतिहास वाचण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, ‘इतिहास वाचला तर लक्षात येईल शिवरायांसोबत मुस्लीम होते की नव्हते. महाराजांच्या बरोबर जे लोक होते, त्यामध्ये मुस्लिम लोकही होते. महाराजांचा दारूगोळा कोण सांभाळत होतं? अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील, असं अजित पवार म्हणाले.
ते म्हणाले की, त्यांनी असं वक्तव्य का केलं हे मला माहित नाही. पण भारतात असलेले मुस्लिम हे देशप्रेमीच आहेत. दोन्ही बाजूच्या सन्मानीय सदस्यांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य करु नये, असे कानही त्यांनी टोचले.
मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले की, ‘आमच्यातील काही कारटे आहेत, शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते सांगणारे. कोण मुसलमान नव्हते, उगाच ते टेपरेकॉर्डर चालवतात. ज्या औरंगजेबाने हिंदू धर्माला संपवण्याची शपथ घेतली त्या औरंगजेबाला थांबवण्याचे आणि आव्हान देण्याचे काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनीच केलं आहे. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच ही लढाई होती. त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकलायला दिले नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे.’


मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. नुकतेच त्यांनी मल्हार सर्टिफिकेशन मटण खावे असा सल्ला हिंदूंना दिला आहे. त्यावरुन वडेट्टीवार म्हणाले की, ‘एक दिवस नितेश राणे सरकारला अडचणीत आणतील. आम्हाला सरकारला अडचणीत आणायची गरज नाही. सरकारला अडचणीत आणण्याची जबाबदारी आम्ही नितेश राणेंवर सोपवली आहे,’ असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. ते म्हणाले की, ‘कोणी कोणते मटण खावे, हे काय चाललं? समाजाच्या भावना, धार्मिक भावना, महापुरुषांचा अपमान हे भाजपचे काम आहे. आता नितेश राणेंनी मल्हार मटण आणले आहे. मल्हार मटण म्हणजे काय? मल्हारराव होळकर काय फक्त मटणच खात होते का? मल्हार हे नाव अनेकांनी ठेवले आहे ते त्यांचे शौर्य आणि कामगिरी पाहून ठेवले आहे. नितेश राणेंची काय ही बुद्धी आहे.’ भाजपने पक्षाचा भाट म्हणून नितेश राणेंना सोडले असावे, असा टोलाही त्यांनी लगावला.



