
संगमनेर दि. १३ मार्च –
शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेतील त्रृटी तातडीने दुरूस्त करून नागरीकांना शुध्द पाणी उपलब्ध करून द्यावे, शहारातील क्रीडा संकुल सर्व नागरीकांना उपलब्ध करण्याचा लवकर निर्णय करावा, तसेच नदी सुधार प्रकल्पाचा निर्णय करण्यापुर्वी अन्य ठिकाणची माहीती घेण्यासाठी पालिकेने समिती नेमावी, अशा सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केल्या.
नगरपालिकेच्या सभागृहात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत महायुती सरकारच्या निधीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा तसेच नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
यावेळी आमदार अमोल खताळ, अतिरीक्त जिल्हाधिकरी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसिलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार, भाजपाचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, अविनाश थोरात, कैलास कासार, ज्ञानेश्वर कर्पे, कपिल पवार, विनोद सूर्यवंशी, रामभाऊ राहाणे, शिवसेनेचे (ठाकरे) माजी नगरसेवक कैलास वाकचौरे व जयवंत पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरात पाणी पुरवठा वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी नागरीकांनी उपस्थित केल्या. शहर आणि उपनगरातील इंदिरानगर, गणेशनगर, मालदाड रोड भागात पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नाही याची गांभिर्याने दखल मुख्याधिकर्यांनी घ्यावी. पाणी अशुध्द असल्याने नागरीकांना दूषित पाणी पुरवठा होतो. जलशुद्धिकरण प्रकल्प कार्यान्वित का नाही असा सवालही मंत्री विखे पाटील यांनी पालिका प्रशासनास केला.

नविन नगर रस्त्यावरील व्यापारी तसेच नागरीकांना पावसाळ्यात होणारा त्रास कमी करण्यासाठी मे अखेरपर्यत या भागात उपाय योजनेचे काम गांभिर्यपुर्वक करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. दशक्रीया विधी घाटाचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण करा. म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामासाठी महायुती सरकारने निधी उपलब्ध करून दिला असल्याने या कामातील गुणवतेबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. एप्रिल अखेरपर्यत हे काम पूर्ण करण्याची ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
शहरामध्ये पालिकेने उभारलेल्या क्रिडा संकुलाचा कोणताही उपयोग नागरीकांना होत नाही. ठराविक लोकांच्या कार्यक्रमासाठी क्रिडा संकुल उपलब्ध करून दिले जात असल्याच्या तक्रारी बैठकीत करण्यात आल्या. यासर्व तक्रारीची दखल घेवून क्रिडा संकुल सर्व नागरीकांना सकाळी आणि संध्याकाळी दोन तास द्यावे, येथे सूरक्षा रक्षक आणि विजेची व्यवस्था उपलब्ध करुन देण्याच्या, भूमीगत गटारीचे काम करताना ठराविक भागात काम झाल्याची तक्रार करण्यात आली. याबाबत वस्तूस्थिती माहीतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
नदीजोड प्रकल्पाच्या बाबतीत कोणतीही घाई न करता अन्य मोठ्या शहरामंध्ये या प्रकल्पाची काय अवस्था झाली याची पाहाणी आणि अभ्यास करावा यासाठी समिती नेमण्याची सूचनाही मंत्री विखे यांनी केली. प्यायला पाणी नसताना बोटी कसल्या फिरवता असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.
नागरीकांच्या तक्रारीबाबत नगरपालिकेने ॲप तयार करावे आणि भाजी विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून कर आकारणी केली जात असेल तर याचा फेरविचार व्हावा, असेही मंत्र्यांनी सूचित केले.
निळवंडे धरणातून पाइपलाइनद्वारे येणारे पाणी अकोले तालुक्याला मोफत देण्याचा निर्णय कोणी कसा केला याची माहीती देण्याची मागणी भाजपाचे श्रीराम गणपुले यांनी केली. याचा कोणताही लेखी करार झाला नसल्याची बाब त्यांनी निदर्शानास आणून दिल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी सर्व प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या.


