
संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी
ठेकेदारी संस्कृती आणि माफीयाराजला पाठबळ देणाऱ्यांनी चाळीस वर्षात जनतेच्या प्रश्नांची उत्तर दिली नाहीत. वर्षानुवर्षे या तालुक्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. आता कुठेतरी तालुक्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. जनता मोकळा श्वास घेवू लागली आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीवर टिका करण्यापेक्षा चाळीस वर्ष आपण काय केले याचे आत्मपरिक्षण करा आणि नव्या विकास प्रक्रीयेत खोडा घालण्याचे काम करु नका असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमध्ये घेतलेल्या बैठकीवर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टिकेला उत्तर देत खताळ म्हणाले, चाळीस वर्ष ज्यांना कोणताच प्रश्न सोडविता आला नाही, ज्यांचे प्रश्न फक्त ठेकेदार आणि माफीयांशी गुंतलेले होते त्यांनी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या पहिल्याच बैठकीत उत्तरांची अपेक्षा करावी हे अत्यंत दुर्दैवी आहे.
सरकारला येवून शंभर दिवस झाले आहेत, तुम्ही तर चाळीस वर्ष सत्तेत होता तरीही संगमनेर शहराला प्रदुषीत पाणी प्यावे लागत आहे. तालुक्यातील जनता अजुनही तहानलेली आहे. ग्रामीण भागात अद्यापही टॅंकर सुरु आहेत. चाळीस वर्षात साधा दशक्रीया विधीचा घाटही तुम्हाला बांधता आला नाही. युवकांच्या रोजगाराच्या संधी निर्माण करु शकला नाहीत. त्यांनी आता लगेच प्रश्नांची उत्तर मागणे म्हणजे स्वत:चे अपयश उघड करण्यासारखे असल्याची टिका केली.

पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत तालुक्याच्या विजेच्या प्रश्नासह पाणी योजनांची कामे निर्धारित वेळेत मार्गी लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तालुक्याची ठप्प झालेली विकास प्रक्रीया पुन्हा एकदा या बैठकांमुळे गतिमान झाली असून, दहशत संपल्यामुळे तालुक्यातील सामान्य माणूस आता विकास कामांसाठी पुढे आला आहे.
यापुर्वी बाह्यशक्ती म्हणून तुमची टिका असायची, परंतू विधानसभा निवडणूकीत तर तालुक्यातील जनतेनेच तुमचा पराभव केला आहे. याचा विचार करा, तुमच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच कारखान्याच्या सभासदांना तीस किलो साखर देण्याची घोषणा तुम्हाला करावी लागली. यापुर्वी कधी सभासदांसाठी असा निर्णय झाला नव्हता. याचाच अर्थ सोयीनुसार तालुक्यातील जनतेला वापरुन घ्यायचे हे धोरण आता सर्वांच्या लक्षात आले आहे.
सत्ता गेल्यानंतर तुम्ही वैफल्यग्रस्त झाले आहात. राजकीय अस्तित्वासाठी कुठला जरी निर्णय घेतला तरी, त्यातला ढोंगीपणा आता उघड होत आहे. तुमच्या प्रत्येक निर्णयाचे विडंबन आता जनता करत आहे. त्यामुळे झालेला पराभव मान्य करा, तालुक्याच्या नव्या विकास पर्वाला आडवे येवून खोडा घालू नका अस खताळ यांनी म्हटलं आहे.


