
अहिल्यानगर, दि. १९ मार्च –
अहिल्यानगर शहरातील बेपत्ता व्यापारी दीपक लालसिंग परदेशी (वय ६८) यांचे खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. १० कोटी रुपयांच्या मागणीसाठी त्यांचे अपहरण करण्यात आले आणि नंतर गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली.
या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी एका बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किरण बबन कोळपे (वय ३८, रा. विळद, ता. अहिल्यानगर) आणि त्याचा साथीदार सागर गीताराम मोरे (वय २८, रा. ब्राह्मणी, राहुरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याचे तपासी अधिकारी आणि तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले.
दीपक परदेशी हे चितळे रस्त्यावर फर्म चालवत होते आणि बोल्हेगाव उपनगरात राहत होते. ते २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते आणि त्यांच्या पत्नीने दुसऱ्या दिवशी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी केलेल्या तपासात, परदेशी यांचे अपहरण करून अधिक रक्कम उकळण्याचा डाव आरोपींनी रचल्याचे समोर आले. त्यांनी परदेशी यांना बोल्हेगाव येथून इंडिका गाडीत बसवून १० कोटी रुपयांची मागणी केली. झटापटीत सागर मोरेने परदेशी यांचे हात बांधले आणि नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला.
त्यानंतर निंबळक बाह्यवळण रस्त्यावर मृतदेह सिमेंटच्या बंदिस्त नालीत टाकण्यात आला. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इंडिका गाडी आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. पुढील तपास सुरू आहे.


