
संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील म्हसवंडी गावच्या परिसरात मंगळवारी दुपारी एका दुर्दैवी घटनेत डोंगराला लागलेल्या भीषण आगीत एका गुराख्याचा आणि त्याच्या एका गाईचा होरपळून मृत्यू झाला.
सिताराम तुकाराम जाधव (वय अंदाजे ५० वर्षे) असे मृत गुराख्याचे नाव आहे. ते म्हसवंडी गावच्या परिसरातील जाधव वस्ती येथे वास्तव्यास होते आणि जनावरे चारण्याचा व्यवसाय करत होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सिताराम जाधव हे त्यांच्या गाई चरायला घेऊन वनविभागाच्या हद्दीत गेले होते. दुपारच्या सुमारास अज्ञात कारणांमुळे डोंगरावर आग लागली. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि जाधव तसेच त्यांच्या गाई आगीच्या कचाट्यात सापडले.
आगीची तीव्रता इतकी जास्त होती की, सिताराम जाधव आणि त्यांची एक गाय जागीच होरपळून मरण पावले. या दुर्घटनेत त्यांची आणखी एक गाय गंभीररित्या भाजली गेली आहे.

सायंकाळपर्यंत सिताराम जाधव घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. रात्रभर शोध घेऊनही ते सापडले नाहीत. बुधवारी सकाळी कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम सुरू केली, तेव्हा त्यांना डोंगरावर सिताराम जाधव आणि त्यांच्या गाईचे जळालेले मृतदेह आढळून आले. ही हृदयद्रावक घटना पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
या घटनेची माहिती तातडीने म्हसवंडीचे सरपंच मंगेश बोडके यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ वनविभाग आणि घारगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने, पोलीस नाईक ज्ञानेश्वर मरभळ, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर आणि चालक मुसळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरला पाठवला आहे.
सरपंच मंगेश बोडके यांनी वनविभागाकडे जाधव यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे म्हसवंडी परिसरात दुःखाचे वातावरण पसरले असून, नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. डोंगरांना आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने वनविभागाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


