संगमनेर, दि. २० मार्च – प्रतिनिधी
“सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढवणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आता आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उसासंबंधीची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल,” असे स्पष्ट मत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन बाबासाहेब ओहोळ होते, तर व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, बाजीराव पा. खेमनर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
थोरात यांनी भविष्यातील तंत्रज्ञानावर भर देत पारंपरिक पद्धतींना आता बदलावे लागेल, असे ठासून सांगितले. “आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती होत आहे आणि लवकरच ग्रीन हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या येतील. त्यामुळे आपण काळासोबत चालले पाहिजे,” असे ते म्हणाले.
आपला सहकार महाराष्ट्रात आदर्शवत असल्याचे सांगत “या कारखान्याने नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत काळानुसार बदल केले आहेत. ५५०० मे. टन क्षमतेचा कारखाना असून ३० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. मागील वर्षात पाच कोटी युनिट वीज वितरित केली असून रिकव्हरी चांगली राखली आहे,” असे नमूद केले.
“आपण कायम चांगले व प्रामाणिक काम केले. कुणापेक्षाही आपण सरस आहोत. सहकार चांगला आहे आणि आपली राजकारणाची पद्धत व परंपरा चांगली आहे. ती टिकवायची आहे. हे सर्व मोडून काढण्याचा प्रयत्न होणार आहे, पण त्या ठिकाणी वेळीच प्रतिकार आपण केला पाहिजे,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे कौतुक करताना थोरात म्हणाले, “कारखान्यामध्ये अनेक चाके रात्रंदिवस फिरत असतात. मोठ्या परिश्रमातून हे काम चालते. ऊस तोडणी कामगार रात्री-अपरात्री काम करतो, वाहतूक, कारखान्याचे यंत्र, हे सर्व अविरतपणे सुरू राहते. हे मोठे काम आहे आणि याला कायम ईश्वराचा आशीर्वाद मिळत असतो.”
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, “सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे तत्त्व घेऊन शेतकरी व सर्वसामान्य जनतेची तळमळ असलेले व्यवस्थापन येथे आहे. संगमनेरच्या सहकाराचा अत्यंत शुद्ध भाव असून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव देण्याची परंपरा या कारखान्याने कायम जपली आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन हे या सहकाराचे वैशिष्ट्य राहिले आहे.”
कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांनी मागील पाच वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला. “कारखान्याने इथेनॉल व अल्कोहोल निर्मितीमध्ये विस्तारीकरण केले आहे, वीज निर्मिती चांगली होत आहे, कारखान्यावरील कर्ज फेडले आहे. नवीन प्रशासकीय इमारत उभी राहिली आहे. चांगला भाव देण्याचे काम कारखान्याने केले आहे. तालुक्याची ही चांगली वाटचाल सर्वांना जपायची असून सध्या तालुक्यात लाईट नाही, पाणी पळवले जात आहे, याकडे नवीन लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही,” अशी टीका त्यांनी केली.

या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या कांचनताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. दुर्गाताई तांबे यांनी कांचनताई यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
ठळक मुद्दे:
* सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना ऊस गळीतात जिल्ह्यात अव्वल.
* अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा सहकारी साखर कारखान्यात पहिला क्रमांक.
* हंगामात ८ लाख २५ हजार ९०० मेट्रिक टन ऊस गाळप.
* वेळेत शेतकऱ्यांचे पेमेंट करण्याबाबतही पहिल्या क्रमांकावर.
* ऊस दराच्या बाबतीतही जिल्ह्यात अव्वल.
* वीज उत्पादन आणि निर्यातीतही जिल्ह्यात पहिला क्रमांक



