
पुणे, दि. २० मार्च –
हिंजवडी येथे एका धावत्या मिनी बसने अचानक पेट घेतल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या जळीत कांडात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगण्यात आले, मात्र आता पोलिसांनी केलेल्या तपासात चालकानेच कट रचून या चौघांना जाळल्याचे उघड झाले आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बसचा चालक जनार्धन हंबर्डे याने पूर्वनियोजित कट रचून हे कृत्य केले. त्याने गाडीमध्ये एक लिटर बेंझीन सोल्युशन केमिकल आणून ठेवले होते. त्यासोबत कापड्याच्या चिंध्या आणि काडीपेटीही त्याने आधीच गाडीत ठेवली होती. तपासात गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. उलट, ड्रायव्हर सीटखाली काडीपेटी सापडल्याने पोलिसांना संशय आला आणि कसून चौकशी केल्यावर आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.
हिंजवडी परिसरात आल्यावर तमन्ना सर्कलजवळ उतारावर असताना त्याने गाडीला आग लावली आणि स्वतः उडी मारून आपला जीव वाचवला.

आरोपी जनार्धन हंबर्डे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचा कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांशी वाद होता. ज्या कर्मचाऱ्यांना तो रोज कामावर घेऊन जात असे, त्यांच्यावरही त्याचा रोष होता. दिवाळीचा बोनस न मिळाल्याने आणि ड्रायव्हिंग व्यतिरिक्त मजुरीची कामे सांगितल्याने तो नाराज होता. याच रागातून त्याने कंपनीत मोठा अनर्थ घडवण्याचा कट रचला आणि चौघांचा जीव घेतला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी चालकावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये आणि मृतांच्या कुटुंबीयांमध्ये शोक आणि संतापाचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



