
मुंबई दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी
गोहत्या करणाऱ्यांवर यापुढे थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला.
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ससाणे नगर येथे फटाके फोडण्यावरून दोन गटात झालेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर, अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या घटनेत कुरेशी आणि ससाणे कुटुंबात झालेल्या हाणामारीत ससाणे कुटुंबातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
जगताप यांनी आरोप केला की, कुरेशी कुटुंब हे गो तस्करीमध्ये गुंतलेले असून, त्यांच्या दहशतीमुळे पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. तसेच, आरोपीला अटक होऊनही लगेच जामीन मिळाला.
जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा गो तस्करीचा गुन्हा केला. या प्रकरणात पोलिसांकडून गंभीर निष्काळजीपणा झाल्याचा आरोप त्यांनी केला.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, गोहत्येच्या संदर्भात वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर यापुढे मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच, या घटनेतील पोलिसांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, गो तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर कठोर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत विधानसभेत व्यक्त झाले.


