
त्र्यंबकेश्वर दि. २३ मार्च –
त्र्यंबकेश्वरच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ११०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरला भेट देऊन या आराखड्याचा आढावा घेतला. या आराखड्यात प्रामुख्याने दर्शनासाठीचा कॉरिडॉर, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, कुंडांचे संवर्धन आणि ब्रह्मगिरी पर्वतरांगांच्या नैसर्गिक सौंदर्याचा विकास यांचा समावेश आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “त्र्यंबकेश्वरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संपूर्ण अध्यात्मिक व्यवस्थेत या तीर्थक्षेत्राला खूप मोठे स्थान आहे. त्यामुळे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकसोबतच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, यासाठी ११०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
या आराखड्याची कामे दोन टप्प्यांत पूर्ण होतील. पहिला टप्पा सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होईल. यामध्ये, दर्शनासाठीचा कॉरिडॉर, पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे, कुंडांचे संवर्धन आणि आवश्यक सुविधांचा समावेश असेल.”

ब्रह्मगिरी पर्वतरांगांच्या नैसर्गिक सौंदर्याचा विकास करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “ब्रह्मगिरी आणि परिसरातील निसर्गरम्य स्थळांना चालना देण्यासाठी नैसर्गिक ट्रेल्स विकसित करण्यात येतील. नाशिकमध्ये ११ पूल आणि मोठे रस्ते बांधण्यात येत आहेत. साधुग्रामचा विकासही करण्यात येत आहे. तसेच, घाटांची संख्या वाढवून तेथे अधिकाधिक सुविधा पुरवण्यात येतील.
गोदावरी नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे. या सर्व कामांसाठी मोठा निधी लागणार असून, सरकार म्हणून आम्ही तिघे (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देऊ,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
या कामांना पुढील महिन्यात सुरुवात करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच, उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कायदा आणि प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. “अध्यात्माची बाजू साधुसंत सांभाळतील, तर प्रशासकीय कामकाज प्राधिकरण बघेल,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.


