
अहिल्यानगर दि. २६ मार्च –
अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मोठी कारवाई करत सचिन पांडुरंग खताळ या दुय्यम निबंधकाला ५००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार हे वकील असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी श्रीगोंदा येथील गट क्रमांक ११७१ मधील ५ हेक्टर ६८ आर क्षेत्रापैकी २८ आर जमीन खरेदी केली होती. या जमिनीच्या खरेदी विक्रीचा दस्त नोंदवण्यासाठी तक्रारदारांनी दुय्यम निबंधक सचिन खताळ यांच्याकडे दिला होता.
खताळ यांनी या कामासाठी तक्रारदाराकडे १०,००० रुपयांची लाच मागितली. त्यानंतर, २६ मार्च २०२५ रोजी तक्रारदाराने आणखी एका जमिनीच्या विक्रीचा दस्त नोंदवण्यासाठी खताळ यांच्याकडे दिला. यावेळी खताळ यांनी या कामासाठी ५००० रुपयांची लाच मागितली.

लाच मागणी पडताळणी दरम्यान, खताळ यांनी तक्रारदाराकडून ५००० रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, एसीबीने सापळा रचून खताळ यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे. खताळ यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक राजू आल्हाट करत आहेत.
पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस नाईक चंद्रकांत काळे पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड व पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ लाड यांनी ही कारवाई केली.


