मुंबई, दि. २८ मार्च – प्रतिनिधी
मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ‘मंत्रालय सुरक्षा प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात चेहऱ्याद्वारे ओळख पटवून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात ‘व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम’ (Visitor Management System) म्हणजेच अभ्यागत व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीनुसार मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच अभ्यागतांना प्रवेशासाठी ‘डिजीप्रवेश’ (Digi Pravesh) या ॲपचा वापर करणे आवश्यक आहे.

मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांनी लक्षात ठेवावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी:
* अभ्यागतांना ज्या विभागामध्ये काम आहे, त्याच विभागात आणि दिलेल्या वेळेत प्रवेश दिला जाईल.
* मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना किंवा पॅन कार्ड यांसारखे कोणतेही एक शासनमान्य ओळखपत्र सोबत ठेवावे.
* ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना दुपारी १२ वाजेपर्यंत रांगेत उभे राहावे लागू नये, याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
* दुपारी २ नंतर मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या अभ्यागतांना ‘डिजीप्रवेश’ ॲपवर नोंदणी करून प्रवेशपास मिळवावा लागेल.
* ज्या अभ्यागतांकडे स्मार्टफोन नाही किंवा जे अशिक्षित आहेत, त्यांच्या मदतीसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर (गार्डन गेट) एक विशेष मदत कक्ष (हेल्प डेस्क) स्थापन करण्यात आला आहे.
* ‘डिजीप्रवेश’ ॲपवर नोंदणी केल्यानंतर एक क्यूआर कोड (QR Code) मिळेल. या कोडच्या आधारे अभ्यागतांना ‘आरएफआयडी’ (RFID) कार्ड दिले जाईल. हे कार्ड सुरक्षा तपासणीसाठी आवश्यक आहे.
* मंत्रालयात प्रवेश केल्यानंतर अभ्यागतांना हे आरएफआयडी कार्ड गळ्यात परिधान करणे आवश्यक आहे. बाहेर पडताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करावे लागेल.


‘डिजीप्रवेश’ ॲप कसे वापरावे…
* हे ॲप अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध आहे.
* ॲप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) किंवा ॲपल ॲप स्टोअरवर (Apple App Store) ‘digi pravesh’ असे सर्च करा.
* ॲपवर एकदाच नोंदणी करावी लागेल.
* नोंदणीसाठी आधार कार्डाद्वारे चेहऱ्याची ओळख पटवली जाईल.
* नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, ज्या विभागात काम आहे त्यासाठी वेळ आरक्षित (स्लॉट बुक) करता येईल.
* या संपूर्ण प्रक्रियेला तीन मिनिटांपेक्षा कमी वेळ लागतो.
या नवीन प्रणालीमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होईल, तसेच अभ्यागतांना रांगेत उभे राहावे लागणार नाही.


