
संगमनेर, दि. ३१ मार्च – प्रतिनिधी
आज रमजान ईदच्या निमित्ताने संगमनेर येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम धर्मगुरु अब्दुल रकीब अब्दुल वहाब पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी वक्फ बोर्डाविरोधात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून हाताला काळ्या फिती बांधून नमाज पठण केले.
नमाज पठणानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानले. या सामूहिक नमाज पठणाला संगमनेर तालुक्यातील अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.

दरम्यान काळ्या फिती लावून करण्यात आलेल्या नमाज पठणाविषयी विचारणा केली असता धर्मगुरु पिरजादे म्हणाले, “केंद्र सरकारने वक्फ बोर्डाविरोधात घेतलेला कायदा मुस्लिम समाजाच्या हितासाठी धोकादायक आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजाला नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आम्ही काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला आहे.”
काही दिवसांपूर्वीच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुस्लिम समाजाच्या भावना व्यक्त करणारे पत्र पाठवले आहे. ‘सौगात ए मोदी’ या उपक्रमाचे आम्ही स्वागत करतो. मात्र समाजात द्वेष पसरवणाऱ्या समाजकंटकांवर वेळीच कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. द्वेष पसरवणारे लोक कोणत्याही धर्माचे किंवा जातीचे नसतात. त्यांचा उद्देश फक्त समाजात दंगल घडवणे आणि तेढ निर्माण करणे हा असतो, असे सांगत धर्मगुरु पिरजादे यांनी पंतप्रधान मोदींना समाजकंटकांवर वेळीच कारवाई करण्याचे आवाहन केले. “जर पंतप्रधान मोदींनी अशा समाजकंटकांवर वेळीच कारवाई केली, तर तीच आमच्यासाठी ईदची खरी भेट असेल,” असे ते म्हणाले.
पिरजादे सय्यद रकीब सय्यद वहाब कादरी, फकीम पीरजादे दिलमिर पीरजादे, मन्नान पीरजादे, अजर पीरजादे, जामील पीरजादे, कासिफ खान, हैदर जहागीरदार, बख्तीयार सय्यद, काशाना सय्यद, शाहरुख शेख, जमीर शेख, शौकत पठाण, वसिल सय्यद, फैसल सय्यद आदींसह मुस्लिम समाजातील समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



