महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर:
त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर जाणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी मार्गावरील सुविधा, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
राज्य शासनाच्या माध्यमातून पालखी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, त्याद्वारे सर्व आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार खताळ यांनी दिले.
बैठकीनंतर त्यांनी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवरील अश्विनीनाथ गड परिसरातील पालखी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यांच्या स्थितीची चाचपणी केली. सध्या मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असले, तरी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आपण विशेषत्वाने मुंबईहून संगमनेरला येणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. या बैठकीला विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि पारेगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.