
संगमनेर, दि. ३१ मार्च – प्रतिनिधी
“भारत हा विविध धर्म, पंथ आणि जातींचा देश असला तरी, मानवता आणि भारतीयत्व या दोन गोष्टी आपल्याला एकत्र जोडतात. रमजान ईद हा पवित्र सण, एक महिन्याच्या उपवासानंतर साजरा केला जातो. जगभरातील मुस्लिम बांधव हा सण मोठ्या आनंदात आणि पवित्र भावनेने साजरा करतात, ज्यात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीची मुख्य बाब आहे आणि रमजान ईद हा बंधुत्व आणि मानवतेचा संदेश देतो,” असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
ईदगाह मैदानावर रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, विश्वास मुर्तडक, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, गणेश मादास, किशोर कालडा, नितीन अभंग, जीवन पंचारिया, गजेंद्र अभंग, लक्ष्मण बर्गे, अभय खोजे, शकील पेंटर, शफी तांबोळी, जावेद शेख, कन्हैया कागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “राष्ट्रपिता महात्मा गांधींनी उपवास हा परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले आहे. उपवासामुळे जीवनातील पवित्रता वाढते. रमजान महिना आनंद आणि प्रेरणा देणारा आहे. भारतीय संस्कृतीत विविधता असून, सर्वधर्म समभावामुळे आपण एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतो. हीच आपल्या देशाची ताकद आहे.
रमजान ईद जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जातो आणि ती बंधुत्व, प्रेम आणि मानवतेचा संदेश देते. सर्वधर्मसमभाव आणि मानवता वाढल्याने देशाची खरी ताकद वाढेल आणि प्रगती होईल.”

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा देताना सांगितले की, “रमजान ईद जगभरात आणि भारतात मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. या काळात महिनाभर उपवास केले जातात. ईश्वराच्या जवळ जाण्याचा उपवास हा मार्ग आहे आणि तो अंतःकरणाच्या शुद्धीसाठी केला जातो.”
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, “भारतात अनेक धर्म आणि पंथ आहेत आणि सांस्कृतिक विविधता ही आपली परंपरा आहे. जात, धर्म आणि पंथ वेगवेगळे असले तरी, आपण भारतीय म्हणून एकत्र येऊन सण साजरे करतो आणि हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे.”
संगमनेर शहरातील मुस्लिम बांधव आणि इतर सर्वधर्मीय लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.



