संगमनेर, दि. १ एप्रिल – प्रतिनिधी
गोवत्स परमपूज्य श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीतून संगमनेर येथे ९ दिवस श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेच्या निमित्ताने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

मंगळवारी सकाळी निघालेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि सनई चौघड्याच्या सुरांनी संगमनेर शहर भक्तीमय वातावरणाने दुमदुमून गेले होते. शेकडो संगमनेरकर महिला पुरुषांसह या शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, एकविरा फाउंडेशनच्या डॉ. जयश्री थोरात यांच्यासह आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम यादेखील सहभागी झाल्या होत्या.
संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे १ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या शुभारंभानिमित्त संगमनेरमधील चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरात राधाकृष्णजी महाराज यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. त्यानंतर ‘प्रभू रामचंद्र की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा जयघोषात शोभायात्रेला सुरुवात झाली.
चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरापासून निघालेली शोभायात्रा रंगार गल्ली, लालबहादूर शास्त्री चौक, नगरपालिका, बाजारपेठ, तेली खुंट, मेनरोड, विठ्ठल मंदिर चावडी, अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्थानक, नाशिक रोड मार्गे मालपाणी लॉन्स येथे पोहोचली.

शोभायात्रेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग… शोभायात्रेत महिला भाविकांनी डोक्यावर तुळस घेऊन भजनांमध्ये सहभाग घेतला. महिलांनी टाळ आणि टाळ्यांच्या तालावर ठेका धरला. प्रभू श्रीरामाची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणुकीत संगमनेरकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
संगमनेरमध्ये ९ दिवस चालणाऱ्या या रामकथेत पहिल्या दिवशी श्रीराम कथा महात्म, दुसऱ्या दिवशी शिव पार्वती विवाह, तिसऱ्या दिवशी श्रीराम जन्मोत्सव, चौथ्या दिवशी बाललीला आणि धनुष्य यज्ञ, पाचव्या दिवशी श्रीरामलला आणि माता जानकी यांचा विवाह सोहळा आणि मिरवणूक, सहाव्या दिवशी वनवास प्रसंग संवाद, सातव्या दिवशी श्रीराम भरत शबरी भेट, आठव्या दिवशी रामचरित्र लंका विजय आणि नवव्या दिवशी प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे.


