
संगमनेर, दि. ३ एप्रिल – प्रतिनिधी
बुधवारी संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. त्यांनी सावरगाव तळ, धांदरफळ, मिर्झापूर, नांदुरी दुमाला, कौठे धांदरफळ, नांदूर खंदरमाळ आणि जांबुत या गावांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला.
कौठे धांदरफळ येथे वीज पडून दोन गाई दगावल्या होत्या, या ठिकाणी आमदार खताळ यांनी भेट देऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच, शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नांदुरी दुमाला येथे जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळली होती. या ठिकाणाचीही त्यांनी पाहणी केली.
या दौऱ्यात आमदार खताळ यांनी कांदा, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, सिमला मिरची, ऊस, गहू आणि बाजरी या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
या पाहणी दौऱ्यात आमदार अमोल खताळ यांच्यासोबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह तहसीलदार धीरज मांजरे, नायब तहसीलदार सुभाष कदम, गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, मंडलाधिकारी, कामगार तलाठी आणि ग्रामसेवक उपस्थित होते.


