
संगमनेर, दि. १० एप्रिल प्रतिनिधी –
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बुधवारी संध्याकाळी संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला आणि मिर्झापूर या गावांतील गारपिटीने बाधित झालेल्या शेतीची पाहणी केली. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. टोमॅटो उत्पादक गणेश वलवे आणि ऊस उत्पादक व भाजपचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष साहेबराव अशोकराव वलवे यांनी त्यांना झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे अचूक पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी समन्वय साधून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

उपविभागीय अधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी माहिती देताना सांगितले की, ९९ टक्के पंचनामे पूर्ण झाले असून त्यांच्या याद्या ग्रामपंचायत आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे चुकून राहिले असतील, त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये नावे नोंदवावीत, त्यांचे पंचनामे उद्या तातडीने पूर्ण केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात तहसीलदार धीरज मांजरे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानवडे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष साहेबराव वलवे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रामभाऊ राहणे, सर्कल ससे मॅडम, तलाठी योगिता वाळुंज, कृषी सहाय्यक मोरे मॅडम, शेलार, गणेश वलवे, भाऊसाहेब भालके, सदू शिरतार, अशोक वलवे, विश्वनाथ वलवे, विकास वलवे, प्रशांत फटांगरे, भाऊसाहेब घोडे, संतोष डोंगरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने साहेबराव वलवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली की, पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्यास मोठी दिरंगाई होते आणि शासनाची मदत नुकसानीच्या तुलनेत खूप कमी असते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. तरी शासनाने भरीव आणि तातडीने नुकसान भरपाई द्यावी. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांची दखल घेतली असून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.


