
संगमनेर, दिनांक १० एप्रिल – प्रतिनिधी
शेतीच्या मालकी हक्कात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि वारसांच्या नोंदी जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ मोहीम सुरू केली आहे. या महत्त्वपूर्ण योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या मोहिमेमुळे सातबारा उताऱ्यावरील मयत खातेदारांची नावे कमी होणार असून, वारसांच्या नोंदीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वारस नोंदीची प्रकरणे मार्गी लागतील, असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.
या निर्णयामुळे सातबारा उताऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होऊन जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील अडचणी दूर होतील. तसेच, वारसांना शेतीविषयक कर्ज मिळवणे सोपे जाईल आणि त्यांच्यातील मालकी हक्कासंबंधीचे वाद टळतील, असेही त्यांनी सांगितले.

या योजनेच्या वेळापत्रकानुसार, १ ते ५ एप्रिल दरम्यान तलाठ्यांनी मृत खातेदारांची यादी तयार करून त्याचे चावडी वाचन केले आहे. आता ६ ते २० एप्रिल या कालावधीत वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची संधी आहे. त्यानंतर २१ एप्रिल ते १० मे दरम्यान ई-फेरफार प्रणालीद्वारे सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी केली जाईल.
अर्ज करताना मृत्यू दाखला, वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र, पोलिस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक) आणि रहिवासी पुरावा सादर करावा लागणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असून कोणत्याही मध्यस्थ किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नयेत, असे आवाहन महसूल विभागाने केले असल्याचे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या वारस नोंदी अद्ययावत कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.


