
पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीने रुग्णांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रुग्णांकडे आधार कार्ड, शिधापत्रिका किंवा अंत्योदय कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असल्यास, त्यांना तातडीने उपचार सुरू करण्याचे आणि पुढील प्रक्रिया नंतर पूर्ण करण्याचे आदेश समितीने दिले आहेत.
या संदर्भात अधिक माहिती देताना आमदार अमित गोरखे यांनी ट्विट केले आहे. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत, यामुळे सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य फुलेल, अशी भावना व्यक्त केली आहे.
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी यासंदर्भात एक पत्र जारी केले आहे. या पत्रानुसार, कोणत्याही रुग्णाला केवळ ओळखपत्रांअभावी मोफत उपचारांपासून वंचित ठेवल्यास संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर आरोग्य यंत्रणेवर सर्वसामान्यांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती. अशा परिस्थितीत, राज्य समितीचा हा निर्णय रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत करेल आणि खासगी रुग्णालयांकडून होणारी हेळसांड थांबवण्यास उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ओळखपत्र नसल्यामुळे अनेकदा रुग्णांना तातडीच्या उपचारांपासून वंचित राहावे लागते, त्यामुळे या निर्णयामुळे आता त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
https://x.com/AmitGorkhe/status/1910210771205902810?t=SCJ2zSDgo9HYpx2eNX9smQ&s=19
आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीच्या पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?…
महोदय, देशामध्ये महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात आघाडीवर असणारे राज्य आहे. कला, संस्कृती, इ. विविध क्षेत्रात प्राविण्य-प्रामाणिकता या सूत्रावर आधारित महाराष्ट्र राज्याचे नावलौकीक आहे. परंतु काळाच्या ओघाबरोबर कधीकाळी वैद्यकीय क्षेत्र प्रामाणिकपणे सेवा करण्याकरिता अग्रणी स्थानी असताना दुर्देवाने वैद्यकीय क्षेत्र औद्योगिक क्षेत्राकडे म्हणजेच पैसा कमवणे, अर्थकारण करणे व तेही सामाजिक तत्त्वांचे उल्लंघन करत उपचारावरील अमाप खर्च वसूल करणे असेच झाले आहे. परंतु रुग्णसेवा करत असताना याचा सुवर्णमध्य काढता आला पाहिजे. रुग्ण आणि रुग्णालय दोन्हीही जिवंत राहून कार्य करता आले पाहिजे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात आयुष्मान भारत मिशन व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेद्वारे महाराष्ट्रातील साडेबारा कोटी लोकांना लाभ देण्याकरिता माननीय पंतप्रधान व मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्तीने सूचना असून “सामान्य माणूस पैशाअभावी किंवा उपचारा अभावी मरता कामा नये”.
आयुष्मान योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांनी गंभीर असलेला रुग्ण दाखल करून घेत असताना संबंधित रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अर्ज लिहून घेतला जातो की, “मला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही”, मुळात आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत संबंधित रुग्णालयांमध्ये योजनेची सुविधा असतांना देखील वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा गैरप्रकार सुरू आहे.
माझी रुग्णालय प्रशासनास नम्र विनंती आहे की, “स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना” ही देखील राज्य आरोग्य हमी सोसायटी अर्थात आयुष्मान योनजेद्वारे नियंत्रित केली जाते. अपघात झालेल्या रुग्णास पैसे न घेता तात्काळ उपचार करण्याची जबाबदारी रुग्णालयांवरती आहे. या योजनेअंतर्गत आधार कार्ड/शिधापत्रिका नंतर दाखल केली तरी जिओ टॅगिंगचा अपघात ग्रस्त रुग्णांचा एक फोटो व नंतर एफआयआर पाठविल्यानंतर योजनेअंतर्गत निधी पाठवला जातो. यामुळे कोणतेही आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसताना अपघातग्रस्त रुग्णांवर तात्काळ उपचार करून रुग्णाचे प्राण वाचवणे हे प्राधान्य ठरते.
राज्यातील एकूण अंगीकृत असलेल्या २०३१ रुग्णालयातील प्रशासनाने व अंगीकृत असलेल्या धर्मादाय रुग्णालयांनी देखील यापुढे रुग्णास तातडीने भरती करून उपचार सुरू करावे. रुग्णास मोफत उपचारापासून वंचित ठेवलयाचे निदर्शनास आल्यास संबंधितांना कठोर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी. कार्यवाही करणे हा उद्देश नाहीये कारण बऱ्याच रुग्णालयांचे रुग्णसेवेत उच्चत कार्य असुन त्यांचे मी अभिनंदन करतो. परंतु काही रुग्णालयांच्या गैरकृतीने राज्याच्या सामाजिक संतुलनावरती विपरीत परिणाम होत असून जनसामान्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. याबाबत लोकप्रतिनिधी /प्रसारमाध्यमांमार्फत शासनास जबाबदार ठरविले जात असून रुग्णालयाच्या रुग्णलुटारू वर्तवणुकींमुळे शासनाची प्रतिमा मलिन होत आहे. सदरील प्रकार चुकीचे असून शासनाचे “सामान्य माणूस पैशाअभावी किंवा उपचाराअभावी मरता कामा नये” हे ध्येय उद्दीष्ट साद्य करण्याकरीता आपण सर्व सहकार्य कराल ही आशा बाळगतो.



