संगमनेर, दि. ११ एप्रिल – प्रतिनिधी
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकरी, शोषित आणि वंचित यांच्या प्रश्नांना सर्वप्रथम वाचा फोडली. त्यांनी बहुजनांच्या विकासाचा, समतेचा आणि पुरोगामी विचार जगाला दिला. सर्वधर्म समभाव, बंधुता आणि समता जपणारा त्यांचा मानवतावादी विचारच देशाला पुढे नेणारा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग समितीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

माळीवाडा येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, धनंजय डाके, सोमेश्वर दिवटे, मालती डाके, अरुण हिरे, अभिजीत ढोले, निखिल पापडेजा, नितीन अभंग, लक्ष्मण बर्गे, गजेंद्र अभंग, सुधाकर ताजने, अतुल अभंग, बंटी मंडलिक, प्रसाद गोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, महात्मा फुले यांनी जगाला समतेचा विचार दिला. त्यांनी आपले संपूर्ण जीवन बहुजनांच्या विकासासाठी समर्पित केले. उपेक्षित वर्गाला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करून स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी मानवतावादाचा विचार मांडला. जातीभेद आणि वाद कमी करणे अत्यंत आवश्यक असून, महात्मा फुले यांचा मानवतावादी विचारच देशाला प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकतो.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय लोकशाही आणि राज्यघटनेत सर्व समाजसुधारक आणि संतांच्या विचारांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरच भारतीय राज्यघटना आधारित आहे. देशाला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी राज्यघटनेतील या मूलभूत विचारांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, महात्मा फुले यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी देशाला समतेचा आणि पुरोगामी विचार दिला. अंधश्रद्धा निर्मूलन, सती प्रथा बंदी आणि केशवपण बंदीसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सामाजिक विषमता नष्ट करून समाजात समानता निर्माण करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.
डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले की, संगमनेरमध्ये सर्व समाज एकत्र येऊन विविध महापुरुषांच्या जयंती साजरी करतो, ही गौरवाची बाब आहे. महात्मा फुले यांचे कार्य समाजाला नेहमीच प्रेरणा देत राहील. त्यांच्यामुळेच स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यांनी महिला शिक्षणासाठी पुढाकार घेत सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका बनवले. तत्कालीन समाजाचा विरोध पत्करून त्यांनी महिला शिक्षणाचा नवा अध्याय सुरू केला आणि त्यामुळेच आज महिला विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. कार्यक्रमानंतर यशोधन संपर्क कार्यालयातही महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संगमनेरमधील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक होणार – आमदार तांबे
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाच्या जीवनात मोठे बदल घडवले. त्यांनी स्वतःच्या पत्नीला पहिली शिक्षिका बनवले आणि तत्कालीन समाजाविरुद्ध बंड पुकारले. शेण आणि दगडांचा मारा सहन करत त्यांनी शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महात्मा फुले यांनी केले असून, त्यांच्या विचारांचा वारसा नेहमी जपला जाईल. संगमनेरमध्ये तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. सुधीर तांबे यांच्या कार्यकाळात माळीवाडा येथे महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्यात आला होता. आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा युवा आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.



