पुणे, दि. ११ एप्रिल –
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी तनिषा भिसे या गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याने तिचा झालेला मृत्यू हा रुग्णालयाने घेतलेला बळी आहे. या धर्मादाय रुग्णालयाने नियम व अटींचा भंग केला असून, दोषींवर कारवाई करण्यास सरकार दिरंगाई करत आहे. रुग्णालयातील दोषींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या रुग्णालयाचे संचालक मंडळ त्वरित बरखास्त करून सरकारने ताबा घ्यावा. तसेच, डॉ. केळकर व रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत एसआयटी चौकशी करावी.अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

आज (शुक्रवार ११ एप्रिल) महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त फुलेवाड्यात अभिवादन केल्यानंतर आणि भिसे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केल्यानंतर सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “लता मंगेशकर यांच्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले, पण आज या रुग्णालयाची अवस्था ‘कोण होतास तू काय झालास तू’ अशी झाली आहे. एका गर्भवती महिलेला पैशासाठी साडेपाच तास ताटकळत ठेवणे आणि उपचार नाकारणे ही अत्यंत वाईट घटना आहे.”
या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज आणि मयत भिसे यांच्या पती तसेच डॉ. केळकर यांचे सीडीआर त्वरित ताब्यात घेण्याची मागणी सपकाळ यांनी केली. ते पुढे म्हणाले, “या घटनेनंतर तात्काळ गुन्हे दाखल व्हायला हवे होते, परंतु सरकार जाणीवपूर्वक वेळ काढत आहे.”
सपकाळ म्हणाले की, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेला प्रकार अमानुष असून माणुसकीला काळिमा फासणारा आहे, एवढी मोठी घटना घडूनही रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांना जराही शरम वाटत नाही. प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जर असे प्रकार घडत असतील, तर ते अत्यंत दुःखद आहे.
या प्रकरणात डॉ. केळकर यांचा सहभाग दिसत असून, प्रशासनाने त्यांना त्वरित बडतर्फ करावे आणि त्यांच्यावर कटात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करावा. डॉ. केळकर यांनी पहिला फोन उचलला, पण नंतर एकही फोन उचलला नाही. एक जबाबदार माणूस असे कसे वागू शकतो? त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे. सरकार हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोपही सपकाळ यांनी केला.

हर्षवर्धन सपकाळ यांनी क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, फुले दाम्पत्य ज्या प्रवृत्तींच्या विरोधात लढले, त्या प्रवृत्तींनी आज पुन्हा डोके वर काढले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा लागू करण्याचा डाव असून, संविधानातील समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. फुले दाम्पत्याने मुलींची पहिली शाळा काढली, त्यावेळी सावित्रीबाई फुलेंवर दगड आणि शेण फेकणारे परदेशातून आले नव्हते, तर महिला शिकली तर धर्म बुडेल या विचारसरणीच्या लोकांनीच त्यांना छळले. आता फुले चित्रपटातून तो भाग वगळण्यास सेन्सॉर बोर्ड सांगत आहे, ही लपवाछपवी कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फुले वाड्यावरील वक्तव्याचा संदर्भ देत सपकाळ म्हणाले की, पूर्वी तसे होत होते, पण आता संविधानामुळे होत नाही, असे ते म्हणाले. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या पक्षाला हे मान्य आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. “भाजपासाठी गोळवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट’ हे बायबल आहे, ज्यात महिला शिक्षणाला थारा नाही. चातुर्वर्ण्याबरोबर पाचवा वर्ण महिला सांगितलेला असून महिलांना अति शुद्र म्हटले आहे, ते चंद्रकांत पाटील यांना मान्य आहे का?” असा थेट प्रश्न सपकाळ यांनी विचारला.
या पत्रकार परिषदेत पुणे शहर जिल्हा अध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चौधरी, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय ठाकरे, प्रदेश प्रवक्ते गोपाल तिवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मानवता हरवली! पैशासाठी गर्भवती महिलेचा बळी; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – हर्षवर्धन सपकाळ
"लता मंगेशकर यांच्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले, पण आज या रुग्णालयाची अवस्था 'कोण होतास तू काय झालास तू' अशी झाली आहे. एका गर्भवती महिलेला पैशासाठी साडेपाच तास ताटकळत ठेवणे आणि उपचार नाकारणे ही अत्यंत वाईट घटना आहे."

