संगमनेर, प्रतिनिधी –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या राज्यघटनेतील समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या तत्वांचे जतन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी. आर. कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
माजी मंत्री थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान विभूतींनी जगाला शांतता आणि समतेचा संदेश दिला. त्यांनी सर्व संत आणि समाजसुधारकांच्या विचारांना एकत्र करून देशाला समतेची राज्यघटना दिली. आज काही लोक सत्तेसाठी राज्यघटनेची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करत असून, त्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहण्याची गरज आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले की, भारतीय संविधान हा देशाचा विश्वास आहे. या संविधानाने उपेक्षित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी न्यायमूर्ती भूषण गवई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून झालेली नियुक्ती हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. भारतीय संविधान जगातील सर्वोत्कृष्ट संविधानांपैकी एक असून, त्याचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य बी. आर. कदम आणि त्यांच्या पत्नी यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. डॉ. राहुल हांडे यांनी यावेळी फुले-आंबेडकर विचारांवर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम गायकवाड यांनी केले.

तालुक्यात विविध ठिकाणी जयंतीचा उत्साह… माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संगमनेर हायटेक बस स्थानक, रिक्षा स्थानक, जोर्वे, वडगाव पान, तळेगाव दिघे, राजापूर, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, यशोधन जनसंपर्क कार्यालय, घुलेवाडी आदी ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.


