
अहिल्यानगर, दि. १४ प्रतिनिधी –
जिल्ह्यातील नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देण्यासोबतच जलसाक्षरता वाढवण्यासाठी १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या पंधरवड्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
या जलसंपदा पंधरवड्याचा शुभारंभ १५ एप्रिल २०२५ रोजी होईल. त्यानंतर १६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, १७ एप्रिल रोजी ‘स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय’ अभियान आणि जल पुनर्भरण यावर भर दिला जाईल. १८ एप्रिल रोजी शेतकरी आणि पाणी वापर संस्था यांच्यात संवाद साधला जाईल, तर १९ एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन संबंधित अडचणींचे निराकरण आणि कालव्यांची संयुक्त पाहणी केली जाईल. २० एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.

उपसा सिंचनासाठी पाण्याच्या परवानग्यांसंबंधी तक्रारींचे निवारण २१ एप्रिल रोजी केले जाईल. २२ एप्रिल रोजी अनधिकृतपणे होणारा वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा शोधून त्यावर कारवाई करण्यात येईल. २३ एप्रिल रोजी जलसंपदा आणि कृषी विभाग संयुक्तपणे पीक पद्धती बदल, उत्पादकता वाढ आणि पाण्याचे नियोजन यावर बैठका व कार्यशाळा आयोजित करतील.
सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली आणि थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा २४ एप्रिल रोजी घेतला जाईल. २५ एप्रिल रोजी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे (KVK) आणि सेवाभावी संस्था यांच्यासोबत संवाद व कृती कार्यक्रम आयोजित केले जातील. २६ एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष पाणी वापराचे परीक्षण आणि पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या सांडपाणी प्रकरणांचा शोध घेतला जाईल. २७ एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन (पूर आणि मालमत्तेचे संरक्षण) केले जाईल.
महसूल विभागाच्या समन्वयाने २८ एप्रिल रोजी महामंडळाच्या नावावर संपादित जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर नोंदी घेणे आणि ३१ मे पूर्वी अतिक्रमण निष्कासन करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. २९ एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र व कार्यशाळा होतील आणि ३० एप्रिल २०२५ रोजी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयात कार्यशाळा, महिला मेळावा आणि समारोप कार्यक्रम आयोजित केला जाईल.
या पंधरवड्यात नागरिकांना जल बचतीचे महत्त्व पटवून देण्यासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने कळवले आहे.

