संगमनेर, दि. १४ एप्रिल – प्रतिनिधी
संगमनेर शहरात लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आज शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ शेतकरी नेते संतोष रोहम, आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, रमेश काळे, शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, सौरभ देशमुख, रणजीत जाधव, अंबादास अनमल, दिपाली वाव्हळ, सोमनाथ भालेराव, भारत गवळी, दिलीप रावळ, शशांक नामन, सिद्धार्थ खरात, मंजाबापू साळवे, भाजपचे राजेंद्र सांगळे, संतोष बलसाने, संपत गेठे, महेश मांडेकर, कांचन ढोरे, संध्या खरे, सपना जाधव यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, समाज बांधवांनी संगमनेर शहरात सामाजिक भवन उभारण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जागा शोधण्याचे काम सुरू असून, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून यासाठी वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. जागा निश्चित झाल्यावर हे कामही लवकरच सुरू केले जाईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच एका सामान्य शेतकर्याचा मुलगा म्हणून त्यांना तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, असे नमूद करत आमदार खताळ म्हणाले की, त्यांच्यामुळेच आपल्याला संविधानाची खरी ओळख झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. तसेच, डॉ. आंबेडकरांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचे काम सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अर्पण केला पुष्पहार… राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.


