महाराष्ट्र संवाद न्यूज –
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संगमनेर आणि पारनेरला दिलेला जोरदार झटका विरोधकांच्या कायम लक्षात राहील. आता श्रीरामपूरकडे लक्ष देणार असून, योग्य वेळी त्यांनाही झटका देऊ, असा स्पष्ट इशारा माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे.

दत्तनगर गावठाण येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दीपक पटारे, नानासाहेब शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. विखे म्हणाले की, राजकारण हे गरीब लोकांना घरे मिळवून देणे, शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करणे आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे यांसारख्या मोठ्या गोष्टींवर आधारित असावे. श्रीरामपूरमध्ये बदल घडवायचा असेल, तर ‘तुझं-माझं’ सोडून जनतेच्या हितासाठी काम करणे गरजेचे आहे.

सत्ता बदलल्यावर काही नेते पक्ष बदलतात, परंतु जर गोरगरीब जनतेची सेवा केली, तर जनता कधीही विसरत नाही. त्यामुळे नेत्यांवर नव्हे, तर जनतेवर विश्वास ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजनेत श्रीरामपूरसाठी ६०० नवीन घरकुले मंजूर झाली असून, ती सोलर सिस्टीमसह उभारली जातील. दत्तनगर हे या प्रकल्पासाठी एकत्रित केंद्र असेल.
श्रीरामपूर शहरातील वाढती गुन्हेगारी, चेन स्नॅचिंग, खंडणी आणि महिला अत्याचाराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठिंबा देणार नाही आणि अशा लोकांना उखडून फेकले जाईल, असा सज्जड दम त्यांनी भरला. डॉ. विखे यांनी गावकऱ्यांनी विकासासाठी एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले.


