महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. हा आदेश आजपासून (१५ एप्रिल २०२५) ते २४ एप्रिल २०२५ पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहील.

या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला शस्त्र बाळगण्यास किंवा जमाव करून फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन करणे, लाठ्या-काठ्या, तलवारी किंवा इतर कोणत्याही प्रकारची शस्त्रे घेऊन फिरणे कायद्याचे उल्लंघन ठरेल. तसेच, पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन कोणताही जमाव करणे देखील या आदेशानुसार प्रतिबंधित असेल.
जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, हा आदेश धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळे, लग्न मिरवणुका आणि अंत्ययात्रांसारख्या पारंपरिक आणि सामाजिक कार्यक्रमांतील जमावांना लागू होणार नाही. याव्यतिरिक्त, कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी आणि इतर शासकीय कर्मचारी तसेच ज्या व्यक्तींनी सभा किंवा मिरवणुका काढण्यासाठी रितसर परवानगी घेतली आहे, त्यांना देखील हा आदेश लागू नसेल.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शांतता आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक होते. त्यांनी नागरिकांना या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे आणि जिल्ह्यातील शांतता राखण्यास मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्र आणि जमावबंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
नागरिकांनी सहकार्य करावे आणि जिल्ह्यातील शांतता राखण्यास मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

