
विशेष प्रतिनिधी / मुंबई
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील महिला मतदारांना देताना दिलेल्या आश्वासनाचा युती सरकारला पद्धतशीर विसर पडला आहे. शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या बहिणीच्या दीड हजाराच्या रक्कमेतून चक्क हजार रुपये कमी होणार आहेत. ज्या योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत येण्यास कारणीभूत ठरली त्या योजनेलाच हात घालण्यात आल्याने राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणी चांगल्याच संतापल्या आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर युती सरकारला बहिणींचा शाप लागेल असं म्हटलं आहे.
निवडणुकीपूर्वी जर आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेत १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ, असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार येऊन चार महिने झाले. तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेत वाढ करण्यात आली नाही. उलट आता दिली जात असलेली रक्कम १००० रुपयांनी कमी केली जाणार आहे. मागील दोन महिन्यापूर्वी अनेक निकषावरून ९ लाख लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आलं आहे. आता विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या आणखी ८ लाख बहिणींना या योजनेत केवळ ५०० रुपये मिळणार आहेत.

सरकारच्या या निर्णयाची विरोधकांनी चिरफाड केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना केवळ निवडणूक जिंकण्यासाठी आणि मतांसाठी आणली होती काय, अशी टीका विरोधी पक्षांनी केली होती. सुरुवातीला लाडक्या बहिणींची मतं घेतली, पण आता पैसे द्यायची वेळ आल्यावर त्यांना नियम आठवतात. यामुळे लाडक्या बहिणींची कळकळ आणि शाप या सरकारला लागेल, अशी बोचरी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केलीय.
सरकारने आठ लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं आहे, यावर बोलताना कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी, जे नियम, अटी आणि निकष पूर्वी होते. तेच आता आहेत. ज्या महिला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेतात अशांना अपात्र करण्यात आलंय. परंतु सरकार कोणावरही अन्याय करणार नाही. सरकारने ज्या-ज्या योजनांची घोषणा केलीय. त्या योजना सुरूच राहतील. आता नवीन कोणतेही नियम किंवा अटी सरकारने आणल्या नाहीत. याउलट या योजनेमध्ये सरकारने २१०० रुपयांचं आश्वासन दिलं होतं, तेही पूर्ण करेल, असं विश्वास कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय.


