महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही वर्षांपासून अस्थिर असलेल्या राजकीय वातावरणात आता आणखी एक नवी आघाडी उदयास येण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी पक्षांविरोधात विरोधकांची धार कमी होत असतानाच, राज्यातील तीन प्रमुख नेते – राजू शेट्टी, बच्चू कडू आणि महादेव जानकर – यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, या तिन्ही नेत्यांनी येत्या रविवारी पुण्यात ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ चे आयोजन केले आहे.
या परिषदेच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटना, बच्चू कडू यांचा ग्रामीण भागातील प्रभाव आणि महादेव जानकर यांचा ओबीसी मतदारांवरील जनाधार एकत्र येणार आहे. “खोट्या आश्वासनांना कंटाळलेल्या तरुणांचा बुलंद निर्धार!” या टॅगलाइनखाली होणाऱ्या या परिषदेत हे तिन्ही नेते सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकणार आहेत. यामुळे राज्यातील राजकारणाला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील बंडखोरीनंतर महायुतीने मोठे यश संपादन केले. तर, महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा), शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांना एकत्रितपणे ५० आमदारांचा आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे विरोधकांची भूमिका काहीशी कमजोर झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर, या तीन मोठ्या नेत्यांची एकत्र येण्याची खेळी सत्ताधारी पक्षांसमोर एक नवीन आणि मोठे आव्हान उभे करू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता या नव्या आघाडीची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


