महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
संगमनेर परिसरातील उद्योग आणि व्यवसायासाठी आधारस्तंभ ठरलेल्या संगमनेर मर्चंट बँकेने आपल्या हीरक महोत्सवी वर्षामध्ये एक हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवले असल्याचे उद्योजक राजेश मालपाणी यांनी म्हटले आहे. बँकेच्या चेअरमनपदी पुन्हा एकदा पाचव्यांदा राजेश मालपाणी यांची एकमताने निवड झाली आहे, तर व्हाईस चेअरमन म्हणून मधुसूदन नावंदर यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा उपनिबंधक संतोष कोरे आणि सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे यांच्या देखरेखेखाली बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात बुधवारी (१६ एप्रिल) चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. दोन्ही पदांसाठी अनुक्रमे राजेश मालपाणी आणि मधुसूदन नावंदर यांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. या घोषणेनंतर सभागृहात टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी मावळते चेअरमन राजेंद्र वाकचौरे, मावळते व्हाईस चेअरमन मुकेश कोठारी यांच्यासह संचालक मंडळातील प्रकाश राठी, संतोष करवा, प्रकाश कलंत्री, संदीप जाजू, महेश डंग, सम्राट भंडारी, वैभव दिवेकर, जुगलकिशोर बाहेती, रविंद्र रत्नाकर पवार, शाम भडांगे, उषा नावंदर, किर्ती करवा, सीए प्रवीण दिड्डी, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष विजय देसाई, उपसरव्यवस्थापक विजय बजाज, सहाय्यक सरव्यवस्थापक विठ्ठल कुलकर्णी आणि शहरातील विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी तसेच बँकेचे सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चेअरमनपदी निवड झाल्यानंतर राजेश मालपाणी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षात एक हजार कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बँकेवर प्रेम करणाऱ्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आणि एकत्रित प्रयत्नांनी हे लक्ष्य नक्कीच साध्य करता येईल.” बँकेच्या संचालक मंडळाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निकषानुसार बँकेने ५२ कोटींहून अधिक नेटवर्थ जमा करून नेट बँकिंगच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना जलद आणि उत्कृष्ट सेवा पुरवण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले. बँकेचे संस्थापक स्वर्गीय ओंकारनाथजी मालपाणी यांच्या प्रामाणिक आणि काटकसरीच्या धोरणांमुळेच बँकेने ही प्रगती साधली असल्याचे त्यांनी नमूद केले.

नवनियुक्त व्हाईस चेअरमन मधुसूदन नावंदर यांनीही आपली निवड एकमताने केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी प्रकाश राठी, ओंकारनाथ भंडारी, जसपाल डंग, राजू बिहाणी, राजेश करवा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट, महेश नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सीए कैलास सोमाणी, सामाजिक कार्यकर्त्या किरण झंवर आणि सहकार खात्यातील सेवानिवृत्त विभागीय आयुक्त आर. सी. शहा यांचे नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करणारी भाषणे झाली.
शहरातील अनेक आर्थिक आणि सेवाभावी संस्थांच्यावतीने राजेश मालपाणी आणि मधुसूदन नावंदर यांचा सत्कार करण्यात आला. मावळते चेअरमन राजेंद्र वाकचौरे आणि मावळते व्हाईस चेअरमन मुकेश कोठारी यांनीही त्यांच्या कार्यकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष करवा यांनी केले, तर आभार प्रदर्शन मधुसूदन नावंदर यांनी केले.

संगमनेर मर्चंट बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षात एक हजार कोटींच्या व्यवसायाचे उद्दिष्ट; राजेश मालपाणी यांची चेअरमनपदी पाचव्यांदा निवड
जिल्हा उपनिबंधक संतोष कोरे आणि सहकार अधिकारी राजेंद्र वाकचौरे यांच्या देखरेखेखाली बँकेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात बुधवारी (१६ एप्रिल) चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली.

