महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर
येथील मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर १९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता मालपाणी लॉन्स येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपणाऱ्या या सोहळ्यात ४१ जोडपी विवाहबद्ध होऊन आपल्या सहजीवनाचा श्रीगणेशा करणार आहेत. या सोहळ्याच्या माध्यमातून लग्नावरील होणारी उधळपट्टी टाळून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला जात असून, या उपक्रमाची २९ वर्षांची गौरवशाली परंपरा यंदाही तितक्याच उत्साहात साजरी होत आहे.
विवाह सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ गरजवंत किंवा मध्यमवर्गीयच नव्हे, तर अनेक उच्चशिक्षित वधू-वरांनीही ‘मालपाणी पॅटर्न’ला पसंती दिली आहे. १९९७ मध्ये स्वर्गीय ओंकारनाथजी आणि स्वर्गीय माधवलालजी मालपाणी यांनी सुरू केलेली ही संकल्पना आज वटवृक्षासारखी वाढली आहे.
आतापर्यंत या उपक्रमातून १६०० हून अधिक कुटुंबे नात्याच्या धाग्यात विणली गेली आहेत. कोणत्याही जाती-धर्माचे बंधन नसलेल्या या सोहळ्यात हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन आणि बौद्ध अशा सर्वधर्मीय वधू-वरांचे विवाह त्यांच्या संबंधित धार्मिक प्रथेनुसार आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले जातात.
या सोहळ्याचे नियोजन अतिशय नीटनेटके असते. केवळ एक रुपयाच्या नाममात्र मोबदल्यात होणाऱ्या या सोहळ्यात वधू-वरांना संसारोपयोगी साहित्याचा आहेर दिला जातो. यामध्ये स्टील कपाट, भांडी आणि रॅक अशा सुमारे तीस हजार रुपये मूल्याच्या वस्तूंचा समावेश असतो. याशिवाय, नवदाम्पत्यांनी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ओळखून एक रोप जोपासावे, या उद्देशाने प्रत्येक जोडप्याला रोपे भेट दिली जातात. या भव्य सोहळ्याला शुभाशिर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सुमारे पंधरा ते वीस हजार नागरिक उपस्थित राहतात.
संपूर्ण सोहळ्याचे नियोजन मालपाणी उद्योग समूहाचे व्यवस्थापक रमेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली विविध समित्यांच्या माध्यमातून केले जाते. उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्यासह संचालक आणि मालपाणी परिवारातील सर्व महिला सदस्य या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतात. सामाजिक ऋण फेडण्याच्या भावनेतून गेली २९ वर्षे अव्याहतपणे सुरू असलेला हा उपक्रम राज्यात एक आदर्श म्हणून ओळखला जात असून, या सोहळ्याला संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन राजेश मालपाणी यांनी केले आहे.
संगमनेरमध्ये मालपाणी उद्योग समूहाचा सामुदायिक विवाह सोहळा: १९ एप्रिल रोजी ४१ जोडपी होणार विवाहबद्ध
या सोहळ्याला संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन राजेश मालपाणी यांनी केले आहे.






