महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
आपल्याला सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी पर्यायी सांस्कृतिक राजकारण उभे करावे लागेल. सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि एक प्रबळ कृती कार्यक्रम आखण्यासाठी सर्व पक्ष आणि संघटनांच्या प्रमुखांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन लोकशाहीर संभाजी भगत यांनी येथे केले.
१५ व्या विद्रोही मराठी साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संगमनेर येथील डाव्या संघटनांच्या वतीने आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक व ‘ताम्रपट’ कादंबरीचे लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या हस्ते संभाजी भगत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रा. पठारे म्हणाले की, मराठी हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रभाषा असून १३०० ते १७०० हा काळ मराठी साहित्याचा सुवर्णकाळ होता. आपला हा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रागतिक विचारांच्या लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायाचा खरा पाया संत नामदेवांनी रचला असून त्यांचे साहित्य संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. संभाजी भगत हे अण्णा गव्हाणकर, शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत, अशा शब्दांत त्यांनी भगत यांच्या कार्याचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना संभाजी भगत यांनी समाजातील विदारक परिस्थितीवर भाष्य केले. तत्त्वज्ञानाने प्रेरित झालेला माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो, असे सांगून त्यांनी वारकरी संप्रदायाचा इतिहास हा विद्रोही इतिहास असल्याचे स्पष्ट केले. विठ्ठलाला जात नसते आणि याच जात विरहित वारकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, तर महात्मा फुलेंच्या विचारांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान घडवले. हाच विचार घेऊन आता आपल्याला नवी चळवळ उभी करावी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अजित नवले यांनी आपल्या भाषणात तरुण नेतृत्वाच्या गरजेवर भर दिला. सध्याचा काळ हा परीक्षेचा असून शेतकरी प्रश्न, बेरोजगारी आणि वाढती अराजकता यांच्या विरोधात विस्कळीत का होईना पण आंदोलने होत आहेत. ही सर्व आंदोलने एकत्र येणे गरजेचे आहे. जात निर्मूलनासाठी सांस्कृतिक चळवळीत शाहीरांची भूमिका महत्त्वाची असून, नवा विचार मांडण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून उद्भवलेल्या वादाचा निषेध करत, आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर या पुस्तकाचे सामुदायिक वाचन करण्याचा निर्धारही व्यक्त केला.
या सोहळ्याला अॅड. मिनल देशमुख, अॅड. रंजना गवांदे आणि अॅड. किरण रोहोम यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ साथी राजाभाऊ अवसक यांनी केले, तर सूत्रसंचालन संजयकुमार शिंदे यांनी पार पाडले. हनुमंत उबाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा नेते रजत अवसक आणि दत्ता ढगे यांनी विशेष परिश्रम घेतले.






