महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर शहरातील हनुमान जयंती मिरवणुकीतील हिंदुत्ववादी युवकांवरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या, शहरात बोकाळलेले अवैध मटका, जुगार आणि दारूचे अड्डे तातडीने बंद करा, मारहाणीच्या बळी ठरलेल्या ललित परदेशी यांच्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हेगारांना अटक करा अन्यथा, येत्या मंगळवारी (२२ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता संगमनेरचे युवक रस्त्यावर उतरून महामोर्चा काढतील! असा थेट आणि कडक इशारा काल गुरुवारी शहरातील संतप्त नागरिक आणि युवकांनी पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, संगमनेरात सध्या कायद्याचे राज्य संपले आहे. खुलेआम गुटखा विक्री, मटका, लोटो गेम, पत्त्याचे क्लब आणि अवैध देशी-विदेशी दारू विक्री तसेच बेकायदेशीर वाळू वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. या अवैध धंद्यांमुळे शहराची शांतता आणि सुव्यवस्था पूर्णपणे धोक्यात आली आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजात यामुळे वितुष्ट निर्माण होत असून, आता तर याच धंद्यांमुळे हिंदू युवकांमध्येही वाद वाढत आहेत, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
संगमनेरची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख नेहमीच सलोख्याची राहिली आहे. मात्र, काही विघ्नसंतोषी राजकीय दबावाखाली सण-उत्सवांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गाव मारुती आणि गाव उत्सवाच्या नावाखाली वर्गणी गोळा करून स्वतःचा उत्सव असल्याचा देखावा करणे चुकीचे आहे. या वादांमध्ये शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचा शंभर टक्के सहभाग असतो. हे व्यावसायिक टोळी बनवून शहरात दहशत निर्माण करत असून, अवैध धंद्यातून कमावलेल्या पैशातून उत्सवांमध्ये विघ्न आणत आहेत, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनात तीव्र शब्दांत सवाल विचारण्यात आला आहे की, शिवजयंतीमधील वाद असो, रामनवमीला मंडळांना दिलेला त्रास असो किंवा हनुमान जयंतीच्या रथोत्सवातील वाद असो; राजकीय स्वार्थासाठी हिंदूंना एकत्र आणायचे नाटक करायचे आणि निवडून आल्यावर खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवायचे, हा कोणता हिंदुत्ववाद आहे?
हनुमान जयंती हा संपूर्ण गावचा उत्सव आहे. गेल्या १०-१२ वर्षांपासून हिंदुराजा ढोल पथक वाद्यांची सलामी देत असताना राजकीय मतभेदातून त्याला विरोध करण्यात आला आणि त्याचे भांडणात रूपांतर झाले. पोलीस आणि जबाबदार नागरिकांसमोर हे घडले आणि शांतही झाले. मात्र, त्यानंतर ढोल पथकातील वादक, कार्यकर्ते आणि वाद मिटवणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले. पोलिसांसमोर खोटे गुन्हे कसे दाखल झाले? कोणाच्या दबावाखाली झाले?, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. वैयक्तिक वादाला सार्वजनिक उत्सवात आणून राजकीय ताकदीचा गैरवापर करत खोटे गुन्हे लादणाऱ्यांविरोधात आता हिंदुत्ववादी आणि शिवप्रेमी युवक गप्प बसणार नाहीत, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

त्यामुळे, जर हे खोटे गुन्हे तातडीने मागे घेतले नाहीत, तर मंगळवारी (२२ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता युवकांचा महामोर्चा निघेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल, असा स्पष्ट आणि कठोर इशारा निवेदनात देण्यात आला आहे. तसेच, ललित परदेशी यांच्या मारहाणीच्या तक्रारीवर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


