संगमनेर पालिकेच्या कारवाई विरोधात शिंदे शिवसेना आक्रमक; भाजीची पाटीच मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात नेत नगरसेविका साक्षी सूर्यवंशींचे ‘गांधीगिरी’ आंदोलन
यापूर्वी पालिकेने शहरात केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाया कितपत यशस्वी झाल्या, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे



या संदर्भात नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना एक सविस्तर व जाब विचारणारे निवेदन सादर केले आहे. १ जून २०२६ रोजी पेटीट हायस्कूल शेजारी आपल्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी बसणाऱ्या गरीब आणि कष्टकरी भाजी विक्रेत्यांवर पालिकेने जी दंडेलशाही केली, त्याबाबत नागरिकांमध्ये आणि विक्रेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
विशेष म्हणजे भाजी व्यवसायात मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग असतो, मात्र पालिकेने सुचवलेल्या नव्या जागेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारे सीसीटीव्ही कॅमेरे आणि हायमॅक्स दिव्यांची कोणतीही सोय केलेली नाही. याशिवाय, प्रशासनाने प्रस्तावित केलेली जागा अत्यंत अपुरी असून, भाजीपाल्याचे कॅरेट आणि टोपल्या ठेवण्यासाठी किमान आवश्यक असलेली जागाही तेथे उपलब्ध नाही.
यापूर्वी पालिकेने शहरात केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाया कितपत यशस्वी झाल्या, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. जोपर्यंत मुख्याधिकारी स्वतः सर्व भाजी विक्रेत्यांना चर्चेसाठी बोलावत नाहीत आणि सर्वांचे समाधान होऊन योग्य मार्ग निघत नाही, तोपर्यंत भाजी विक्रेत्यांना आहे त्याच ठिकाणी बसू द्यावे व कोणतीही एकतर्फी कारवाई करू नये, अशी ठाम भूमिका या आंदोलनाद्वारे घेण्यात आली आहे.