
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर
जिल्हाधिकारी कार्यालयात आता महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अपील प्रकरणांवर ई-सुनावणी प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या या शुभारंभामुळे जमीन व मालमत्तेशी संबंधित वाद, हक्क नोंदणी, फेरफार, उताऱ्यावरील दुरुस्ती आणि मालकी हक्काच्या प्रकरणांची सुनावणी आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
या सुविधेमुळे महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे. शासनाकडून संपूर्ण महसूल व्यवस्था डिजिटल करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ‘पेपरलेस व पारदर्शक प्रशासन’ देण्यावर भर दिला जात आहे. ई-सुनावणी ही संकल्पना सामान्य नागरिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

यामुळे महसूल प्रकरणांवरील निर्णय लवकर होतील आणि कामकाजात अधिक सुसूत्रता येईल. लवकरच तालुका कार्यालयांमध्येही ही सेवा सुरू करण्यात येणार असून, नागरिकांना त्यांच्या घरी बसूनच न्याय मिळवण्याचा मार्ग उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
या नवीन प्रणालीमुळे आता पक्षकार आणि वकिलांना वारंवार जिल्हाधिकारी कार्यालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-सुनावणी घेतली जाणार असल्याने घरबसल्या आपले म्हणणे मांडणे शक्य होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि शारीरिक श्रम वाचणार आहेत. यासोबतच पारदर्शकपणे आणि वेळेत निर्णय देणे शक्य होणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सांगितले.


