
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
संगमनेर तालुक्यातील आगामी पाच वर्षांसाठी म्हणजेच सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीच्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणाची विशेष सोडत येत्या २३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही महत्त्वाची प्रक्रिया संगमनेरच्या नवीन नगर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. तर २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत होणार आहे.
तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, संगमनेर यांच्या कार्यालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या संबंधीचे प्रकटन माध्यमांना न देता समाज माध्यमात व्हायरल होताना दिसत आहे.
या महत्त्वपूर्ण सोडतीच्या वेळी जिल्ह्यातील सर्व संबंधित ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि तालुक्यातील इच्छुक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची चिन्ह आहेत.

या विशेष सोडतीमध्ये तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधील सरपंचपदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी किती जागा आरक्षित असतील, हे निश्चित केले जाईल. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही आरक्षण सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे कोणत्या प्रवर्गातील व्यक्तींना सरपंचपदासाठी संधी मिळणार, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
दरम्यान, जाहीर प्रगटनात नमूद करण्यात आलेल्या सूचनांनुसार, सोडतीच्या वेळी उपस्थित राहणाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. अधिक माहिती आणि पुढील सूचनांसाठी नागरिकांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष आता या आरक्षण सोडतीकडे लागले आहे. या सोडतीनंतरच तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.



