अहिल्यानगर, दि. २१ –
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात अहिल्यानगर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल तीन पुरस्कार पटकावले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले आणि राहाता येथील मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. याप्रसंगी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्य स्तरावर दखल घेण्यात आली. या उत्कृष्ट कार्याबद्दल तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना २०२३-२४ चा राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्याचबरोबर, सन २०२४-२५ च्या पुरस्कारांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या श्रेणीत देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे धडाडीचे मुख्याधिकारी विकास नवले आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत राहाता येथील कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार पटकावला.

तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. जिल्हा प्रशासनाने गौणखनिज व्यवस्थापन, ई-रेकॉर्ड्स, ई-कोर्ट प्रणाली, ई-ऑफिस, ‘जलदूत’ पाणीटंचाई व्यवस्थापन आणि भू-संपादन यांसारख्या महत्वाच्या उपक्रमांमध्ये तंत्रज्ञानाचा यशस्वीपणे अवलंब केला.
मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांनी महसूल विभागाशी संबंधित पुस्तकांचे राज्यातील पहिले क्युआर कोड वाचनालय तयार करून एक अभिनव संकल्पना साकारली. त्यांनी लिहिलेली ११ महत्त्वपूर्ण पुस्तके आता क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांसाठी सहज उपलब्ध झाली आहेत.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले यांच्या कुशल नेतृत्वाखाली नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानातंर्गत एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. शहरालगतच्या ३० गावांसाठी सक्शन मशिनद्वारे मैला उपसा आणि गाळ व्यवस्थापनासाठी पंचायत समिती राहुरी आणि संबंधित ३० ग्रामपंचायतींबरोबर त्यांनी करार केला आहे. या महत्त्वपूर्ण करारामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील स्वच्छतेच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेचे राज्य स्तरावर कौतुक होत आहे.


