जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना पुणे येथील एका दिमाखदार सोहळ्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसेवा दलाच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार डॉ. तांबे यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय आणि पुरोगामी चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यासाठी प्रदान करण्यात आला.
पुणे येथील सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या मार्गदर्शिका डॉ. शैलाताई नरेंद्र दाभोळकर, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुरेश ठाकूर, प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन वैद्य, साजदा निहाल अहमद, डॉ. भीमराव आंबेडकर, हेमंत नाईकनवरे, जयवंत पाटील, अजित शिंदे, राजा कांदळकर, अतुल देशमुख, जाकीर अत्तार, अरविंद सावला आणि सुनील यादव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. सुधीर तांबे व त्यांच्या पत्नी दुर्गाताई यांना शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन राष्ट्रसेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी गौरविले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या प्रकट मुलाखतीत प्रसिद्ध कवी प्रा. अरुण म्हात्रे यांनी डॉ. तांबे यांच्या जीवनप्रवासाचे विविध पैलू उलगडले.
पुरस्काराला उत्तर देताना डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या वैचारिक जडणघडणीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, घरात लहानपणापासूनच पुरोगामी वातावरण होते. विद्यार्थीदशेत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरील पुस्तकाने आपल्यावर मोठा प्रभाव टाकला आणि येथूनच वैचारिक परिवर्तनाला सुरुवात झाली. संगमनेरमधील रंगार गल्लीतील वास्तव्याचा उल्लेख करत त्यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, बी. जे. खताळ पाटील आणि भास्करराव दुर्वे नाना यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या सहवासातून राजकारणाचे धडे मिळाल्याचे सांगितले. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना साने गुरुजी प्रतिष्ठानला दिलेल्या भेटी आणि तेथील वैचारिक चर्चांनी आपल्या विचारांना धार दिली.
संगमनेरमध्ये एम. एस. सर्जन म्हणून उत्तम प्रॅक्टिस सुरू असतानाही, भाऊसाहेब थोरातांचे आदर्श संस्कार, शिस्त आणि प्रामाणिकपणा जपत त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करताना हाच विचार पुढे नेल्याचे सांगत, बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपली विचारधारा सोडली नाही, असा उल्लेख त्यांनी केला. आपण पुरोगामी विचारांचे पक्के कार्यकर्ते असून, लोकशाही आणि राज्यघटनेचा विचार घेऊन तरुणांच्या माध्यमातून विज्ञानवादी समाज घडवण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुलाखतकार प्रा. अरुण म्हात्रे यांनी डॉ. तांबे यांच्या साधेपणाचे आणि अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले. महाराष्ट्राच्या राजकारणात राहून सर्वांना बरोबर घेऊन जाणारे डॉ. तांबे यांचे व्यक्तिमत्त्व तरुणांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल, असे ते म्हणाले.
या वेळी माजी आमदार शिरीष चौधरी, डॉ. शैलाताई दाभोळकर आणि माजी आमदार कपिल पाटील यांनीही मनोगते व्यक्त करून डॉ. तांबे यांच्या कार्याचा गौरव केला. या सोहळ्यासाठी हिरालाल पगडाल, अनिकेत घुले, दत्ता ढगे यांच्यासह संगमनेर येथील राष्ट्रसेवा दल, छात्र भारती आणि जयहिंद युवा मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुधीर तांबे यांना हा सर्वोच्च सन्मान मिळाल्याबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, पांडुरंग पाटील घुले, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, डॉ. जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, सोमेश्वर दिवटे, नूर मोहम्मद शेख, अजय फटांगरे, निखिल पापडेजा, अर्चनाताई बालोडे, प्रमिलाताई अभंग, विश्वास मुर्तडक यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.