महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर:
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख हे सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य देणारे अत्यंत लोकप्रिय व कर्तबगार नेते होते, असे गौरवउद्गार जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.
स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथील ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना डॉ. सुधीर तांबे यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख आणि माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यातील दृढ संबंधांना उजाळा दिला. विलासरावजींचे बाळासाहेब थोरात यांच्यावर भावासारखे प्रेम होते. त्यांनी मुख्यमंत्री असताना थोरात यांच्याकडे लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. या दोन्ही नेत्यांची जनमानसाप्रती असलेली तळमळ आणि कार्यशैली सारखीच होती. विलासरावजींचे संगमनेर तालुक्यावर विशेष प्रेम होते, म्हणूनच बाळासाहेब थोरात यांच्या मागणीवरून त्यांनी संगमनेर शहरासाठी निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजना अवघ्या दोन मिनिटांत मंजूर केली होती, अशी आठवणही डॉ. तांबे यांनी स्पष्ट केली. विलासरावजींचे रुबाबदार व्यक्तिमत्व, प्रभावी भाषणशैली, हजरजबाबीपणा आणि सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध यामुळे ते कायम जनतेच्या हृदयात राहतील, असे सांगत सध्या काँग्रेस पक्ष अडचणीत असताना त्यांच्या नेतृत्वाची उणीव प्रकर्षाने भासत असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते नवनाथ आरगडे यांनी विलासरावजींनी महाराष्ट्रात काँग्रेसचे विचार आणि परंपरा रुजवण्यात मोठे योगदान दिल्याचा उल्लेख केला, तर सुभाष सांगळे यांनी त्यांचे नेतृत्व आणि भाषणे तरुणांसाठी कायम प्रेरणादायी राहतील असे सांगितले. याप्रसंगी सुधाकर जोशी, ॲड. त्रंबक गडाख, दिलीप जोशी, बाळासाहेब पवार, बाळासाहेब गायकवाड, भास्कर शर्माळे, जावेद शेख, अनिता दिघे, शितल उगलमुगले, अमित गुंजाळ यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना नेहमीच प्राधान्य : मा. बाळासाहेब थोरात
दुसऱ्या एका संदेशात काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य व माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. सध्या देशातील अर्थव्यवस्था ढासळली असून इंधन दरवाढ, महागाई आणि बेरोजगारीमुळे शेतकरी व सर्वसामान्य माणूस अस्वस्थ आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आजचे केंद्र आणि राज्य सरकार या प्रश्नांवर उदासीन असल्याचे सांगत थोरात म्हणाले की, याउलट स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वातील काँग्रेस आघाडी सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या व गरिबांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य दिले. आपले हसतमुख आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेल्या विलासरावजींनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान दिले आहे.


