महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
आज (बुधवारी, २३ एप्रिल) पहाटे पाच वाजता संगमनेरच्या भारत नगरमधील कादरी मस्जिदच्या मागील बाजूस गल्ली नंबर १ येथे एका वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

संगमनेर मध्ये पोलिसांकडून सातत्याने कत्तलखाना चालकांवर कारवाया केल्या जात आहे. संगमनेर शहर पोलीस, पोलीस उपअधीक्षक आणि अहिल्यानगर च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून संगमनेर मधील कत्तलखान्यांवर सातत्याने छापेमारी केली जात आहे. यातून वारंवार या अवैधरित्या चालणाऱ्या कत्तलखान्यांमध्ये गोवंश जनावरांची हत्या होत असल्याचे समोर आले आहे. या शिवाय वारंवार तेच तेच आरोपी निष्पन्न होत आहेत. संगमनेर चे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर नगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात काही कत्तलखाने उद्ध्वस्त केले. मात्र अद्यापही संगमनेर मध्ये गोवंश जनावरांच्या कत्तली सुरूच आहे. याप्रकरणी आमदार खताळ काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
कारवाई पूर्वी एका वाड्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी छापा टाकला. कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकाला घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून ३,६०,०००/- रुपये किंमतीचे १२०० किलो गोमांस आणि कत्तल करण्यासाठी वापरलेला एक सुरा जप्त केला आहे.

आरोपी अदनान इक्बाल कुरेशी (वय १९) याने हे कृत्य केले असल्याचे समोर आले. त्याला घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस शिपाई रोहिदास शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक – ३४०/२०२५, बीएनएस कलम २७१, ३२५ सह महाराष्ट्र पशुसंरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ (क), ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव हे करत आहेत.


