महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
व्यक्ती आणि संघटनांना बेकायदेशीर ठरवण्याचे अमर्याद अधिकार राज्य सरकारला देणाऱ्या प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) काल (मंगळवार,२२ एप्रिल) संगमनेरमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन केले. अकोले आणि संगमनेर तालुक्यातील हजारो श्रमिक या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले आणि त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला.

राज्य सरकार शहरी नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात सरकारच्या धोरणांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या आणि आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर कारवाई करण्याचे प्रचंड अधिकार या विधेयकामुळे सरकारला मिळणार आहेत. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेला राज्य सरकार बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर कठोर कारवाई करू शकणार आहे.
या विधेयकांतर्गत दोषी आढळलेल्या व्यक्तीस दोन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा आणि त्यांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे अमर्याद अधिकार सरकारला मिळतील. यामुळे सरकारी धोरणे आणि निर्णयांवर कोणत्याही प्रकारचे मतप्रदर्शन करणे किंवा त्यांची चिकित्सा करणे पूर्णपणे अशक्य होणार आहे. केवळ राजकीय पक्ष किंवा संघटनाच नव्हे, तर पत्रकार, विचारवंत, कवी, लेखक, युट्युब चॅनेलचे चालक, अशा कुणालाही सरकारच्या धोरणांवर आपले मत व्यक्त करता येणार नाही.
सरकारला विरोध करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर या कायद्यान्वये कारवाई होऊ शकते. हे विधेयक संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारांवर थेट हल्ला असून, ते सर्व प्रकारच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करणारे आहे, असे मत आंदोलकांनी व्यक्त केले.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील डाव्या पक्षांनी आणि समविचारी संघटनांनी या विधेयकाविरोधात राज्यभर जोरदार आंदोलने केली आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्यातील पत्रकारांनीही सरकारला या विधेयकाकडे लक्ष वेधून ते मागे घेण्याची मागणी केली होती.

संगमनेर शहरातील स्वातंत्र्य चौकातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाजवळ अकोले आणि संगमनेर तालुक्यातील हजारो श्रमिक एकत्र आले. संगमनेर शहरातील पुरोगामी विचारांच्या संघटनांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य चौकातून एका विशाल मोर्चाला सुरुवात झाली. जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरून संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकला. येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना वक्त्यांनी राज्य सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली.
डॉ. अजित नवले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “एकीकडे हे सरकार शेतकरी, शेतमजूर, कामगार, आशा सेविका, अंगणवाडी ताई, बांधकाम कामगार, शालेय पोषण आहार कर्मचारी, युवक, विद्यार्थी आणि महिला अशा सामान्य जनतेवर आपल्या धोरणांच्या माध्यमातून हल्ले करत आहे. त्यांच्या धोरणांमुळे या श्रमिकांचे जगणे मुश्किल झाले आहे आणि दुसरीकडे याच अन्यायकारक धोरणांविरुद्ध जनतेने आवाज उठवू नये म्हणून जनसुरक्षासारखी विधेयके आणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारची ही कृती पूर्णपणे संविधान विरोधी आणि लोकशाही विरोधी आहे. महाराष्ट्रातील जनता ही दादागिरी कदापि सहन करणार नाही.”
या मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी कॉ. सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ताराचंद विघे, नंदू गवांदे, नशीब वरपे, वसंत वाघ, हेमलता शेळके, गणेश ताजने, संगीत साळवे, रंजना पराड, अनिता साबळे, निर्मला मांगे, नंदा म्हसे, द्रौपदा रावते, प्रकाश साबळे, शिवराम लहामटे, मथुराबाई बर्डे, आशा घोलप, अविनाश धुमाळ, लक्ष्मण घोडे, सुनील बांडे, काळू मेंगाळ आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


